अरुण गोखले
प्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे ह्यांनी माणूस खऱ्या अर्थाने किती मोठा आहे हे कसे ओळखावे? याबाबत असे सांगून ठेवले आहे की- माणूस म्हणून तुमचे मोठेपण हे जगात फक्त दोन गोष्टी सांगत असतात त्या म्हणजे संयम आणि नम्रता. तुमच्याकडे काहीही नसले तरी तुम्ही दाखवलेला संयम आणि तुमच्याकडे सर्व काही असूनही तुम्ही राखलेली नम्रता या दोन गोष्टीच तुमचं मोठेपण सिद्ध करीत असतात. माणसाचं काय आहे त्याला त्याच्या मूलभूत गरजा तर भागाव्यात असे वाटतेच पण त्याहीपेक्षा त्या अधिक चांगलेपणाने कशा भागतील ह्यामागे तो सतत धावत असतो. अपेक्षेचे मृगजळ त्याला वेड्यासारखे फिरायला लावण्याशिवाय दुसरे काही करत नाही.
इथं खरं तर एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे “”दुसरोंकी खुशी देख हैरान मत होना। भगवान तुझे भी देगा जरा इंन्तजार करना।।”. पण मानवी स्वभावच असा आहे की त्याला थांबायला, वाट पाहायला, संयम राखायला जमतच नाही. त्याला सारं कसं अगदी लगेच आणि तो म्हणेल तेव्हा हवं असतं. इथंच माणसाचं संयमाशी, सबुरीशी नातं दुरावतं आणि तो दु:खीकष्टी, असमाधानी होतो. त्यामुळेच नाही त्याची खंत न करता आहे त्यात समाधान मानणे आणि प्रामाणिक प्रयत्नांनी अपेक्षा पूर्तीची वाट पाहणे म्हणजेच संयम राखणे हे त्याला जमत नाही.
कुणाकडे हा संयम नसतो तर कुणाकडे जे आणि जेवढे म्हणून त्याला मिळाले आहे, त्याचा नकळत येणारा उन्माद, अहंकार येतो. ती व्यक्ती इतकी आत्मकेंद्रित झालेली असते की त्याला आपल्या सभोवतीच्या वास्तवतेचेही भान नसते. त्याला त्याच्या ज्ञान, श्रीमंती, अधिकार, मोठेपणा याचा इतका कैफ चढलेला असतो की तो माणूस माणसांच्या जगात वावरत असला तरी इतरांशी साधे माणुसकीनेही वागत नाही.
माणसाने इतरांशी आदर, प्रेम, आस्था, आपलेपणा, मायाममता ह्यांनी एकमेकांची मने जिंकत, दुसऱ्याची तहान भूक, त्याची गरज ओळखत जगत आणि जगवत जायचं असत. पण त्यासाठी असणारं माणसाचं मोठ मन दातृत्व, दिलदारपणा आणि चालण्या बोलण्यातली, वागण्यातली नम्रता कायम टिकून ठेवावी लागते. जीवनात प्राप्तीसाठी संयम आणि प्राप्तीनंतर नम्रता राखणे हीच माणसाच्या मोठेपणाची खरी खूण आहे, हे विसरता कामा नये.