नवी दिल्ली : राज्यात भाजप आणि शिवसेना युती संपुष्ठात येण्याच्या मार्गावर आहे. या संदर्भात कोणतीही औपचारिक घोषणा झालेली नसली तरी मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेतील दरी आणखीनच वाढली आहे. शिवसेना आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत सत्ता स्थापन करण्यासंदर्भात चर्चा करण्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) मित्रपक्ष संयुक्त जनता दलाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटले आहे की, आम्हाला याच्याशी काही देणे घेणे नाही. याबद्दल त्यांना (शिवसेना) त्यांचेच माहिती आहे.
Chief Minister of Bihar, Nitish Kumar on being asked ‘Shiv Sena has left NDA, what do you have to say?’: Vo jaane bhai isme humko kya matlab hai? pic.twitter.com/ayIKzNPEkr
— ANI (@ANI) November 11, 2019
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, सरकार स्थापण्याच्या दिशेने आम्ही पहिले पाऊल टाकले आहे… आता जर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला भाजपला सत्तेतून बाहेर ठेवायचे असेल तर त्यांनी किमान समान कार्यक्रम निश्चित करून सरकार स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस शिवसेनेसोबत जाणार का, त्यांना पूर्णपणे पाठिंबा देणार का, हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. या संदर्भात दिल्ली आणि मुंबईमध्ये अनुक्रमे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठांची बैठक सुरू आहे.