दत्तात्रय आंबुलकर
उत्तराखंडच्या कसौली या गावाने निर्मल गाव म्हणून मोठा नावलौकिक कमावला आहे. भारत-नेपाळ-चीनच्या सीमावर्ती भागातील हे गाव जिल्ह्याचे ठिकाण असणाऱ्या पियौरागडपासून जवळ असून गावालगतच सैन्यदलाचे ठाणे आहे. सध्या सुमारे 3500 लोकसंख्या असणाऱ्या गावाच्या विकासात सैन्यदलाचेही मोठे योगदान आहे.
आपले निर्मलग्राम स्वरूप साकारण्यासाठी गावकऱ्यांनी स्वच्छतेच्या संदर्भात मोठे प्रयत्न केले आहेत. आज गावच्या प्रत्येक घराबाहेर कचरा जमा करण्यासाठी दोन कचराकुंड्या उपलब्ध केल्या असून, गावातील आठ ठिकाणी मोठे कचराकुंड तयार केले आहेत. त्यामुळे गावचा प्रत्येकजण आपल्या घराबाहेरील कचराकुंडीत कचरा टाकतो व हाच कचरा सार्वजनिक कचराकुंडात एकत्र केला जाऊन त्यावर प्रक्रियेद्वारा खतनिर्मिती करून त्याचा लाभ स्थानिक शेतकऱ्यांना होतो. गावचे सरपंच रघुवीरसिंह यांच्यानुसार राज्य शासनातर्फे कसौली ग्रामपंचायतीला जो विकासनिधी वा अनुदान प्राप्त होते. त्याचा शतप्रतिशत उपयोग गाव आणि गावकीच्या विकासासाठीच केला जातो. यातूनच 2015 मध्ये या गावाने हागणदारी मुक्ती साध्य केली. त्यापाठोपाठ 2018 मध्ये कसौली गावाने राज्य सरकारचा स्वच्छता गौरव पुरस्कार व केंद्र शासनाचा दीनदयाळ राष्ट्रीय ग्रामपंचायत पुरस्कार यासारखे पुरस्कार प्राप्त केले आहेत.
गावचे सरपंच रघुवीरसिंह यांच्यानुसार 2014 पर्यंत या गावची स्थिती फारशी आशादायी नव्हती. गावच्या कामाख्या देवीचे मंदिर हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान व यात्रेचे ठिकाण म्हणून पंचक्रोशीत प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. भाविकांचे येणे-जाणे व पूजा-सामग्री-निर्माल्यामुळे वापरलेल्या अनेक वस्तू नंतर कचरास्वरूपात उपलब्ध होत होता. मंदिरात भाविकांना सोयीचे व्हावे म्हणून मंदिर-देवस्थानने विविध टप्प्यांवर टांगत्या निर्माल्यकुंड्या बांधल्या व त्याचा वापर भाविकांनी अधिकाधिक करण्यासाठी आवाहन केले गेले. कामाख्यादेवीला व मंदिर-संस्थानचे कार्य आणि कार्यकर्त्यांना लोक अधिक मानतात ही बाब लक्षात घेता कामाख्या मंदिर मंगलदल या स्वच्छता संस्थेचीच स्थापना करण्यात आली. मंगलदलाने गावकरी व मंदिरात येणाऱ्या भाविकांना मंदिराप्रमाणेच आपले घर-शिवार, परिसर, दुकान, शाळा, बसथांबा इ. सर्व ठिकाणी स्वच्छता ठेवण्याचे मार्गदर्शन केले. याशिवाय ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावच्या पाणवठा व पाणीसाठ्याची विशेष स्वच्छता अभियानच छेडले गेले.
याच प्रयत्नांच्या पुढच्या टप्प्यात सौर प्रणालीद्वारा पंपिंगद्वारा साऱ्या गावाला स्वच्छ पाणीपुरवठा सुलभतेने व आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा केला जातो. गावातील कचरा व मंदिरातील निर्माल्याद्वारे उपलब्ध होणाऱ्या खताद्वारा गावातील प्रत्येक शेतकऱ्याला आता खताचा लाभ व त्याद्वारे अधिक उत्पादक आणि लाभदायी शेती शक्य झाली आहे. मंदिरातील निर्माल्याद्वारा होणाऱ्या खतामुळे होणाऱ्या आर्थिक उत्पन्नाचा उपयोग गावातील शाळेत अधिकाधिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे व गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अद्ययावत सुविधा-उपचार उपलब्ध करून देण्यासाठी होत आहे. याशिवाय मंदिराचे दर्शन व यात्रा-उत्सवांच्या माध्यमातून गावातील घरटी कमीत कमी एकाला रोजगार मिळणार आहे. स्वच्छतेतून स्वावलंबनाचा कसौली गावाने प्रेरणादायी वस्तुपाठ सर्वांसमोर स्पष्ट केला आहे.