मुंबई (प्रतिनिधी) – अनेक वर्षांनंतर आज न्याय मिळाला असून हा वाद आता संपला आहे. आज केवळ देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगभरातील हिंदूंना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येत आहे. एक अध्याय संपला आहे आणि आता नवीन पर्व सुरू झाले आहे.आजचा दिवस देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्याचा दिवस आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
शिवनेरी, अयोध्येला भेट देणार
गेल्या वर्षी 24 नोव्हेंबरलाच आपण अयोध्येला गेलो होतो. त्यावेळी सोबत शिवजन्मभूमीची माती मी नेली होती. आज या मातीचा चमत्कार बघा, एक वर्ष पूर्ण होण्याच्या आतच निकाल आला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत आपण शिवनेरीला जाणार असून पुन्हा जर कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती ठिक असेल तर 24 नोव्हेंबरलाच अयोध्येला जाण्याचा विचार असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.
ज्या वेळी या देशात हिंदू शब्द उच्चारला जात नव्हता, त्यावेळी बाळासाहेबांनीच हिंदुत्वाचा अंगार फुलविला होता. “गर्वसे कहो हम हिंदू है’ म्हणत हिंदुत्वाचा आवाज बुलंद केला होता. त्यांच्यासोबतच आज विहिंपचे अशोक सिंघल, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि अटलबिहारी वाजपेयी या सर्वांचीच आठवण येते आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी तर यासाठी रथयात्राही काढली होती, असे सांगतानाच आपण अडवाणींना दिल्लीत जाउन भेटणार असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे म्हणाले, राममंदिरासाठी मोठे आंदोलन उभारण्यात आले त्याचेच हे यश आहे. त्यासाठी कारसेवेत शहिद झालेल्यांना आपण मानाचा मुजरा करतो. या निर्णयाचा आनंद निश्चित साजरा करायला हवा पण तो करताना कोणतेही वेडेवाकडे पाउल उचलायला नको, असेही ते म्हणाले. शिवसेनेने जर निकालाला विलंब होत असेल तर सरकारने अध्यादेश काढावा अशी मागणी करत हा विषय पुन्हा ऐरणीवर आणल्यानंतर अनेकजण जागृत झाले. पण आता निकाल आला आहे. तो निकाल देणाऱ्या न्यायदेवतेला आपण वंदन करत असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.