पाथर्डी: तालुक्यातील फुंदेटाकळी येथील कोरडगाव रोडवर असणाऱ्या विहिरीवर पाणी शेंदत असतांना १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. वैभव भागवत फुंदे असे या घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
वैभव हा शनिवारी शेतात कापूस वेचणीसाठी गेला होता. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेला आणि विहिरीवर पाणी शेंदत असताना त्याचा तोल गेल्याने विहिरीत पडला. हि घटना परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर लगेचच तरुणांनि विहिरीत उड्या मारून वैभवचा शोध घेण्यास सुरवात केली. परंतु विहिरीला पाणी जास्त असल्याने तरुणांना वैभवचा शोध लागत नव्हता.
नागरिकांनी तातडीने पाच ते सहा उपसा मोटारी विहारीत सोडून पाणी उपासण्यास सुरवात केली, परंतु त्यात बराच वेळ गेल्याने अखेर वैभवचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहहती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी होती. तसेच या घटनेसंदर्भांत प्रशासनाला तात्काळ माहिती देऊन देखील उशिरा पर्यंत प्रशासनाची कुठलीही यंत्रणा घटनास्थळावर पोहचली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान वैभवाचे आई वडील हे शेती करत आहेत. या घटनेमुळे फुंदेटाकळी गावावर शोककळा पसरली आहे.