खासदार डॉ. अमोल कोल्हे : “विघ्नहर’च्या 34व्या गळीत हंगामाचा शुभारंभ
निवृत्तीनगर- सध्या साखर कारखानदारीची अवस्था अत्यंत बिकट असून साखर कारखाने उर्जित अवस्थेत आणण्याकरीता ब्राझीलच्या धर्तीवर भारत सरकारने इथेनॉल मिक्सींगचे ठोस धोरण जाहीर करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.
जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा 34 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ शनिवारी (दि. 9) शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकरी, माजी आमदार दिलीप ढमढेरे, उपाध्यक्ष अशोक घोलप, सुमित्रा शेरकर, जयहिंद ग्रुपचे तात्यासाहेब गुंजाळ, विघ्नहर देवस्थानचे अध्यक्ष बी. व्ही. मांडे, तान्हाजी बेनके, अनंत चौगुले, जिल्हा दूध संघाचे बाळासाहेब खिलारी, जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, अंकुश आमले, हभप रामदास कुटे, रमेश भुजबळ, गणेश कवडे, मकरंद पाटे, अजित काळे, पांडुरंग गाडगे, निवृत्ती काळे, माजी नगराध्यक्ष दिनेश दुबे, वैभव कोरडे, प्रदीप थोरवे, नंदूकाका शेरकर, सुखदेव नेहरकर, नगरसेविका हाजरा इनामदार, अर्चना भुजबळ, उज्वला शेवाळे, विजय भोर, गणपत शेटे, गणपत कवडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
आमदार अतुल बेनके म्हणाले की,काळात कारखान्याच्या विकासाकरीता सत्यशिल शेरकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून ऊस उत्पादक शेतकरी वर्गाच्या हितासाठी काम करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. दिलीप ढमढेरे म्हणाले की, माजी खासदार स्व. निवृत्तीशेठ शेरकर व त्यांच्या नंतर सत्यशील शेरकर यांनी कारखान्याचा कारभार अगदी उत्कृष्ट पद्धतीने करीत असल्याने या परिसरातील शेतकरी खऱ्या अर्थाने समृद्ध झाला असल्याचे त्यांनी नमूद केले.
- …तर कारखाना चालवणे अवघड
विघ्नहर कारखान्याने ऊस उत्पादकांना सतत चांगला भाव देण्याचा प्रयत्न केला. सतत पेक्षा जास्त भाव देण्याची परंपरा कायम ठेवली; परंतु आयकर विभागाने विघ्नहर कारखान्याला जास्त भाव दिल्याने 205 कोटी रुपये इन्कमटॅक्स भरण्याची नोटीस पाठवली आहे. उत्पन्नातून खर्च वजाजाता शिल्लक राहिलेली रक्कम जर विघ्नहर कारखाना ऊस उत्पादकांना देत असेल तर ती जास्तीची रक्कम कारखान्याचा नफा समजून जर त्यावर इन्कमटॅक्स लावत असेल तर कारखाने चालू ठेवणे अशक्य होणार असल्याचे सत्यशील शेरकर यांनी स्पष्ट केले. - कारखान्याकडून 2785 अदा -शेरकर
विघ्नहर सहाकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने 2018-19 साठी गळीतास आलेल्या उसास विनाकपात 2950 रुपये प्र. मे. टन दर देण्याचे ठरविले आहे. आतापर्यंत सभासद व ऊस उत्पादकांना 2785 रुपये अदा केलेले आहेत. उर्वरीत 165 रुपये पैशांची उपलब्धता झाल्यानंतर अदा करण्यात येतील, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली.