नवी दिल्ली: भारताविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात विजय मिळवून बांगलादेशने ऐतिहासिक कामगिरी केली. आतापर्यंत बांगलादेशला 9 टी-20 सामन्यात भारताविरुद्ध एकही विजय मिळवता आलेला नव्हता. 3 टी सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना बांगलादेशने 7 गडी राखून जिंकला. कर्णधार रोहित शर्माने या सामन्यातील पराभवासाठी गचाळ क्षेत्ररक्षण आणि डीआरएसचे चुकीचे निर्णय जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
बांगलादेशच्या मुश्फिकुर रहीमच्या नाबाद 60 धावांच्या खेळीच्या जोरावर पहिल्यांदाच भारताचा टी-20 मध्ये पराभव केला. भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा 9 वा सामना होता. सामना संपल्यानंतर रोहित शर्माने सांगितलं की, फलंदाजांनी धावा केल्या होत्या. धावसंख्येचा बचाव करणं शक्य होते. मात्र, मैदानावर आम्ही अनेक चुका केल्या आणि सामना गमावला. खेळाडूंचा अनुभव काही ठिकाणी कमी पडला. चुकांमधून ते शिकतील आणि पुढच्या वेळी चुका करणार नाहीत. डीआरएसमध्ये आमच्याकडून चूका झाल्या.
रोहित शर्माने बांगलादेशच्या संघाचं विजयाबद्दल अभिनंदन केलं. रोहित म्हणाला की, बांगलादेश विजयाचे अधिकारी होते. जेव्हा आम्ही फलंदाजी करत होतो तेव्हापासूनच आमच्यावर दबाव टाकला होता. तसेच भारताकडून क्षेत्ररक्षणही खराब झाल्याचे रोहित म्हणाला.
भारताचा गोलंदाज युझवेंद्र चहलने टी-20 मध्ये पुनरागमन केले. त्याने 4 षटकांत 24 धावा देत एक विकेट घेतली. त्याचाबद्दल रोहित म्हणाला की, चहलने मधल्या षटकांत त्याची उपयुक्तता सिद्ध केली. ज्यावेळी फलंदाज स्थिरावतो तेव्हा त्याचा उपयोग होतो. चहलला माहिती आहे की त्याला काय करायचे आहे. म्हणूनच नेतृत्व करणेही सोपे होऊन जाते, असे रोहितने सांगितले.