नवी दिल्ली : इस्रायली सॉफ्टवेअर वापरून केल्या जाणाऱ्या हेरगिरीवरून कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. हे कृत्य केवळ बेकायदा आणि घटनाबाह्यच नव्हे तर लाजीरवाणे आहे. हे हेरगिरीचे सॉफ्टवेअर मोदी सरकारने मिळवले आहे, असे त्या म्हणाल्या.
भारतातील मानवतावादी कार्यकर्ते आणि पत्रकारांची अज्ञात संस्थडेकडून हेरगिरी केली जात आहे. त्यामुळे नागरिकांचा खासगीपणा धोक्यात आल्याचा दावा फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सऍपने केला. त्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी ही टीका केली. देशातील अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे, लोकशाही संस्था कमकुवत केल्या जात आहेत. संख्याकीय बदल करून भारतीय अर्थव्यवस्थेची विश्वासाहर्ता धोक्यात आणली जात आहे, असे त्या म्हणाल्या.
भारतीय अर्थव्यवस्थेत आलेली मंदी मान्य करून त्यावर उपाय योजना करण्या ऐवजी मोदी बातम्यांचे मथळे आणि कार्यक्रमात झळकण्याचे व्यवस्थापन करत आहेत. विभागीय व्यापक आर्थिक सहकार्यावरूनही त्यांनी मोदींवर टीका केली. त्या म्हणाल्या, यामुळे शेतकरी, दुकानदार, लहान आणि मध्यम व्यावसायिक यांच्या अडचणींत वाढ होणार आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर व्यापक प्रमाणात होणार आहे.
सकल राष्ट्रीय उत्पन्नात पहिल्या तिमाहीत केवळ पाच टक्के वाढ झाली. बेरोजगारीचा दर 8.5 टक्क्यांवर पोहोचणे अस्वस्थ करणारे आहे. अलिकडे झालेल्या अभ्यासातून नोटाबंदी, जीएसटी आणि अशा स्वरूपाच्या मोदी सरकारच्या आर्थिक निर्णयामुळे गेल्या सहा वर्षात देशातील 90 लाख रोजगारांवर गदा आली आहे.