उदयनराजे यांची निवेदनाद्वारे मागणी
सातारा – अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पूरस्थिती यामुळे ग्रामीण भागातील शेती व व्यवसायाच्या नुकसानभरपाईसाठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावून एक महिन्याच्या आत आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. ईर्मा योजना तातडीने लागू करावी, कोलमडलेल्या शेतकऱ्याला शासनाने योग्य ती मदत देऊन धीर द्यावा, अशी मागणीही त्यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री व मुख्य सचिवांकडे केली आहे. या मागण्यांची पूर्तता झाली नाही तर, शेतकऱ्यांच्या असंतोषामुळे कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. प्रसंगी महाराष्ट्रातील शेतकरी असंतोषाचे नेतृत्व आम्हाला करावे लागले तर ते आम्हीच करु, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उपाययोजना सुचवताना दिलेल्या या निवेदनात उदयनराजे भोसले यांनी नमूद केले आहे की, यावर्षी ऑगस्ट महिन्यात विशेषतः सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मोठा पूर आला. त्यामुळे शेती पिकांचे, जनावरांचे व शेतकऱ्यांच्या साधन संपत्तीचे आणि ग्रामीण भागातील 12 बलुतेदार व 18 अलुतेदार यांच्या व्यवसायांचे मोठे नुकसान झाले आहे. या पूरपरिस्थितीच्या वेळी सार्वत्रिक निवडणुका लागल्यामुळे नुकसान भरपाईचा प्रश्न अधांतरी राहिला. हातातोंडाला आलेल्या ज्वारी,बाजरी, भुईमुग, सोयाबीन, कापूस, आलं, बटाटे, कांदा, टॉमॅटो, डाळी, द्राक्षं, डाळींब, केळी, भाजीपाला या सर्व पिकांचे नुकसान झाले आहे.
पश्चिम महाराष्ट्राबरोबरच मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील काही भाग, पूर्ण कोकण या भागात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदतीसाठी केंद्र व राज्य सरकारकडे उदयनराजे भोसले यांनी मागण्या केल्या आहेत. त्यानुसार नुकसान झालेल्या पिकांचा सर्वे ड्रोनच्या माध्यमातून करावा अन्यथा गावचे सरपंच व कृषीसहायक यांनी केलेला नुकसान भरपाईचा सर्व्हे गृहीत धरावा, ही कार्यवाही एका आठवड्यात पूर्ण करुन घ्यावी या मागणीसह नुकसान झालेल्या भागात बॅंक, पतसंस्था, इतर संस्थांच्या पीक तसेच मुदत कर्जांपासून शेतकऱ्यांना मुक्त करावे, प्रतिएकरी कमीतकमी धान्य पिकांसाठी 30 हजार रुपये आणि कापूस, द्राक्ष, डाळिंबे, उस आदी पिकांसाठी एकरी 60 हजार रूपयांपर्यंत नुकसान भरपाई शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे जमा करावेत, आदी मागण्यांचा समावेश आहे. या उपायोजनांची अंमलबजावणी झाली नाही तर शेतकऱ्यांचा असंतोष कायदा-सुव्यवस्था पाळण्याच्या पलीकडे असेल, असे त्यांनी सांगितले.