राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केली राजकीय नेत्यांवर टीका
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील हुर्रियत आणि मुख्य प्रवाहातील पक्षांचे नेते, धार्मिक प्रचारक आणि मौलवींनी त्यांचा प्रभाव सामान्य काश्मिरींच्या मुलांना ठार मारण्यासाठी वापरला आहे, तर त्यापैकी कुणीही स्वत:चे नातेवाईक दहशतवादामुळे गमावले नाहीत, असे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मंगळवारी सांगितले. काश्मीरमधील श्रीमंत, शक्तिशाली घटकांनी तरुणांच्या स्वप्नांना चिरडून टाकले आणि त्यांचे जीवन नष्ट केले, असा आरोप राज्यपालांनी केला आणि लोकांना सत्य समजून घ्यावे आणि राज्यात शांतता व प्रगती होण्यासाठी केंद्राच्या प्रयत्नात सामील व्हावे असे आवाहनही केले.
त्यांची स्वत: ची मुले परदेशात शिक्षण घेत आहेत आणि चांगल्या प्रकारे स्थायिक आहेत. परंतु सामान्य मुलांच्या मुलांना ते मारण्याचा “जन्नत’ मार्ग दाखवतात. असे कटरा शहरातील श्री माता वैष्णो देवी विद्यापीठाच्या सातव्या दीक्षांत समारंभात बोलताना मलिक म्हणाले.
राज्यपाल झाल्यानंतर मी गुप्तचर यंत्रणांकडून माहिती घेतलेली नाही. मी थेट 25 ते 30 वयोगटातील 150 ते 200 भरकटलेल्या तरुणांशी बोललो. त्यांना हुर्रियत, राज्य सरकार किंवा केंद्र सरकारशी काहीही घेणेदेणे नाही. त्यांना केवळ शहिद होऊन “जन्नत’मध्ये जाण्याचे स्वप्न दाखवले गेले आहे, असे राज्यपाल म्हणले.
तब्बल 22,000 काश्मिरी तरुण शिक्षणासाठी राज्याबाहेर आहेत. त्यांना शिक्षणासाठी बाहेरगावी का जावे लागेल? कारण गेल्या अनेक दशकांपासून आपण त्यांना आपल्या राज्यात चांगले शिक्षण देऊ शकलेलो नाही.
राजकारण्यांनी जम्मू-काश्मीरमधील लोकांच्या गरजेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही राज्यपालांनी केला. स्थानिक
काश्मिरात दिल्या जाणाऱ्या पैशाचा उपयोग राजकारणी आणि नोकरदारांनी योग्य पद्धतीने केला असता तर तुमच्या घरांची छप्पर सोन्याची झाली असती, असेही ते म्हणाले.