काचेच्या आवरणाच्या इमारती पर्यावरणाला घातकच
– श्रीनिवास वारुंजीकर
पुणे – कॉंक्रीटचे रस्ते आणि वाढत्या इमारतींबरोबरच सध्या सर्वच महानगरांमध्ये इमारतींना काचा अथवा धातूची आवरणे लावण्याची फॅशन आली आहे. दिसायला अत्यंत आकर्षक आणि कमीतकमी देखभाल खर्च असलेल्या या काचांच्या आवरणाच्या इमारती परिसरात मात्र उष्णता निर्माण करत आहेत. वस्तुत: अशा काचांची गरज ही ध्रुवीय प्रदेशातील घरांसाठी आदर्श ठरते. मात्र भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंधातल्या देशात हे ग्लास फेकेड’चे आवरण म्हणजे परिसरातील तापमान वाढवण्याचा प्रकार ठरतो आहे.
पुण्याजवळच विविध उपनगरांत माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटी पार्क उभी राहिली आहेत. बाणेर, बालेवाडी, हिंजवडी, वाकड, बाणेर, औंध, खराडी, मगरपट्टा सिटी, येरवडा, विमाननगर, कल्याणीनगर, येरवडा अशा विविध उपनगरांसह सेनापती बापट रोडसारख्या भागात आयटी कंपन्यांचे विस्तृत जाळे पसरले आहे. या सर्व कंपन्यांच्या इमारती अशा ग्लास फेकेडसनी कव्हर केलेल्या दिसतात.
मात्र, अशा इमारतींवरील काचेच्या आवरणामुळे ती इमारत तापायला अधिकच मदत होते. या काचा सूर्यकिरणे परावर्तीत करत असल्याने डोळ्यांना दीपवणारा प्रकाश तर येतोच शिवाय त्याबरोबर उष्णताही परावर्तीत होते. त्यामुळे परिसरातले तापमान अधिकच वाढते. काचेच्या आवरणामुळे इमारतीमध्ये जास्ती एअर कंडिशनिंग करावे लागते. त्यामुळे अर्थातच विजेचा वापर आणि वीज बिलही वाढते. इतकेच नव्हे, तर त्यामुळेच पर्यावरणाला घातक असलेला ग्रीन हाऊस इफेक्ट’ही जाणवतो. हा ग्रीन हाऊस इफेक्ट’ म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग’ अर्थात वैश्विक तापमानवाढीचे एक महत्त्वाचे कारण आहे.
याशिवाय या काचांमधून इमारतीमध्ये येणारी सूर्यकिरणे आणि अतिरिक्त प्रकाश नियंत्रित करण्यासाठी परत पडदे, डिव्हायडर्स अशी साधने वापरावी लागतात. दिवसा बाहेरून पाहणाऱ्याला या इमारतींच्या आतल्या भागाचा अंदाजही येत नाही. मात्र रात्री, इमारतीत दिवे असताना, आत काय चालले आहे, याची स्पष्ट कल्पना बाहेरुन येते.
वास्तविक, एनर्जी कॉन्झर्व्हेशन बिल्डींग कोडच्या मान्यतेनुसार, एखाद्या इमारतीला काचेचे आवरण लावण्यासाठी 40 टक्केच पृष्ठभाग वापरायची परवानगी असते. 60 टक्के भाग आवरणविरहीत ठेवायचा असतो. मात्र, बहुतांश इमारतींमध्ये या नियमाचे उल्लंघन झालेले दिसते.
विटांच्या भिंतींपेक्षा काचांच्या भिंती/आवरणे त्या मानाने पातळ असल्याने बाहेरून येणारा वाहनांचा, गर्दीचा, स्पिकर्सचा आवाज या इमारतींमध्ये विनासायास शिरतो. त्यामुळे इमारतीचे ऑकॉस्टीक (ध्वनीवहन क्षमता) बिघडते. अशा इमारती ज्या परिसरात आहेत. त्या भागात पक्ष्यांना भरारी घेता येत नाही. काचांवरून परावर्तीत होणाऱ्या सूर्यकिरणांमुळे पक्षी दिशा चुकतात आणि इमारतींना धडकून जखमी किंवा मरणही पावतात.