वाहन मालक आक्रमक : विधानसभेसाठी निवडणूक आयोगाला वाहन मिळण्यास अडचणी
सोमाटणे – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या निवडणूक कामासाठी वापरण्यात आलेल्या खासगी चारचाकी वाहनांचा भाडेभत्ता अद्याप मिळाला नाही, त्यामुळे मावळ तालुक्यातील मालक, चालकांनी विधानसभा निवडणूक कामकाजासाठी मोटारी, वाहने न पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. वाहन मालकांच्या या ठाम भूमिकेमुळे निवडणूक आयोगाला उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत (आरटीओ) मान्यताप्राप्त खासगी वाहने मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.
एप्रिल-मे महिन्यात झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुका संदर्भात पिंपरी-चिंचवड आरटीओच्या वतीने काही खासगी वाहनांच्या मावळ विधानसभा अंतर्गत मावळ तालुक्यात निवडणुकीच्या कामासाठी निर्देश देण्यात करण्यात आले. मात्र आरटीओच्या या निर्णयाबाबत वाहन मालकांनी गांभिर्याने घेतले नाही. एका वाहनाकरिता दररोज 2200 रुपये प्रमाणे मानधन देण्याचे ठरले होते. याशिवाय वाहनाच्या इंधनावर होणारा खर्च देखील निवडणूक आयोग करणार होते. मात्र शिरगाव, सोमाटणे, तळेगाव दाभाडे, पवनानगर, दारुंब्रे, साळुंब्रे आदींसह ग्रामीण भागातील 21 वाहन मालकांनी आपली वाहने या निवडणूक कामकाजासाठी उपलब्ध करून दिली. निवडणुकीसाठी सुमारे 35 दिवस ही सर्व वाहने वापरण्यात आली. या कालावधीतील वाहनभाडे सुमारे 15 ते 16 लाख रुपये थकीत आहेत.
दरम्यान, या कामाचे मानधन हे निवडणूक झाल्यावर दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले. परंतु निवडणूक झाल्यावर बिलाची विचारणा करण्यासाठी वाहनमालकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. आजपर्यंत 20-25 चकरा मारल्या आहेत. निवडणूक कार्यालयातील संबंधित अधिकारी हे वारंवार भेटूनही उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. तर काही अधिकाऱ्यांनी 10 दिवसांत बील मंजूर होईल, असे पोकळ आश्वासन देत आजपर्यंत वाहन मालकांना झुलवत ठेवले असल्याची प्रतिक्रिया वाहन मालकांनी दिली.
आता सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील वाहनबील आयोगाकडून थकविण्यात आले असताना आता विधानसभा निवडणुकीसाठी वाहन उपलब्ध करून कशी देणार असा सवाल वाहन मालकांनी उपस्थित केला आहे. मागील बिल मिळाले नसताना विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा वाहनाची मागणी करण्यात आली आहे. या वाहनमालकांनी नकार दिला आहे, तसेच मागील थकीत बील तत्काळ मिळावे आणि आमची दिवाळी निवडणूक आयोगाने गोड करावी, अशी मागणी विजय वाडेकर, प्रसाद सावंत, विजय भुजबळ, दीपक अरगडे, दिनेश गोपाळे, सुधीर गोपाळे, संतोष देशमुख, दादा टिळे, सुजित जगधाने, प्रकाश धोंडरे, भैया गोयल, प्रशांत कारंडे, दिनेश राजे, गणेश राजे यांनी दै. “प्रभात’शी बोलताना केली आहे.
सहा महिन्यांपासून थकीत; खासगी वाहनचालकांमध्ये नाराजी
आरटीओ कार्यालयाच्या आदेशानुसार आम्ही लोकसभा निवडणुकीसाठी आमची वाहने या निवडणुकीच्या कामकाजासाठी दिल्या. आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह वाहन व्यवसायावर अवलंबून आहे. तसेच वाहनाचे मासिक हप्ते देखील वाहनातून येणाऱ्या कमाईवर अवलंबून आहेत. त्यामुळे थकीत हप्ते भरण्यासाठी कर्ज काढण्याची वेळ आमच्यावर आली आहे.
– दीपक अरगडे, वाहन मालक.
लोकसभा निवडणुकीच्या कामाचे थकीत बिला संदर्भात तत्कालीन तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निधीची मागणी केलेली आहे. परंतु अद्याप निधी प्राप्त झालेला नाही. निधी प्राप्त होताच थकीत भाडे दिले जाईल.
– मधुसूदन बर्गे, तहसीलदार, मावळ.