सौरव गांगुली सेकंड इनिंगसाठी सज्ज
मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी निवड निश्चित झाल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने आनंद व्यक्त केला आहे. मंडळाची प्रतिमा डागाळली असताना अध्यक्षपदाची धुरा माझ्याकडं येते आहे. काहीतरी चांगले करून दाखवण्याची ही मोठी संधी आहे, अशी प्रतिक्रिया गांगुलीने दिली.
मंडळाच्या बैठकीत गांगुली याचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आले आहे. गांगुलीनी अर्ज दाखल केला असून आणखी कोणाचाही अर्ज आलेल्या नसल्याने त्याची निवड बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गांगुलीची निवड केवळ औपचारिकता उरली आहे. गांगुली सांगितले, मी याआधी देशासाठी खेळलो आहे. भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. देशातील क्रिकेटच्या प्रसाराचे तसेच प्रगतीसाठी काम करण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे. गेल्या तीन वर्षांत मंडळाला अनेक प्रकारच्या आरोपांचा सामना करावा लागला आहे. मंडळाच्या प्रतिमेला तडे गेले आहेत. ती प्रतिमा बदलण्याची संधी मला मिळाली आहे. बिनविरोध निवड होणे ही मोठी जबाबदारी आहे. आर्थिकदृष्ट्य्ा भारतीय मंडळ श्रीमंत असल्याने माझ्यापुढे आव्हान असेल, असे तो म्हणाला.
गांगुलीला अवघ्या 10 महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. या अल्प कार्यकाळात प्रथम श्रेणी क्रिकेटपटूकडे माझे प्राधान्याने लक्ष राहील, असेही तो म्हणाला. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समिती गेल्या 33 महिन्यांत ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले, ते करण्याचा माझा प्रयत्न राहील. त्यासाठी मी सर्व संबंधितांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटकडे लक्ष देण्याची गरज मी गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय समितीकडे व्यक्त केली होती.
मात्र, त्यांनी कानाडोळा केला. साहजिकच माझे पहिले प्राधान्य प्रथम श्रेणी क्रिकेटला असेल. प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा माझा प्रयत्न असेल, असे तो म्हणाला. अध्यक्ष म्हणून अवघा 9 ते 10 महिन्यांचा कालावधी मिळणार आहे, याची खंत आहेच. मात्र, तो नियम आहे आणि तो मान्य करावाच लागणार आहे, असे तो म्हणाला. अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरलेल्या गांगुलीने काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतरच त्याच्या नावावर एकमत झाले अध्यक्षपदाच्या पाठिंब्याच्या बदल्यात पश्चिम बंगालमध्ये भाजपचा प्रचार करावा लागणार आहे का, असे विचारले असता त्याने नकारार्थी उत्तर दिले.
अवघ्या दहा महिन्यांचा कार्यकाळ
भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता सेकंड इनिंगसाठी सज्ज झाला आहे. सौरव गांगुली हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष होणार हे आता स्पष्ट झाले आहे. मंडळाच्या रविवारी झालेल्या बैठकीत गांगुलीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे त्याची निवड आता केवळ औपचारिकता राहिली आहे.
अध्यक्षपदाच्या निवडीवरून मंडळामध्ये दोन गट पडले होते. माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर व एन. श्रीनिवासन यांच्या गटांनी आपापली नावे पुढे केली होती. या दोन्ही नावावरून चर्चा झाली. अखेर गांगुलीच्या नावावर सर्वसहमती झाली. अध्यक्षपदासाठी गांगुलीचे नाव येण्याआधी या नावासाठी चर्चेत असलेल्या कर्नाटकटचे ब्रिजेश पटेल यांच्यावर आयपीएलचे निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवली जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा हे मंडळाचे सचिव म्हणून तर, अनुराग ठाकूर यांचे बंधू अरुणसिंह ठाकूर हे खजिनदार म्हणून काम पाहतील. आसाम क्रिकेट संघटनेचे देवजीत सैकिया यांचे नाव सहसचिव पदासाठी
चर्चेत आहे. येत्या 23 ऑक्टोबर रोजी मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रद्द होण्याची चिन्हे आहेत.
अध्यक्षपदी गांगुलीचे नाव निश्चित होण्याआधी अनेक घडामोडी घडल्या. मंडळाचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन याचा गट ब्रिजेश पटेल यांच्या नावासाठी आग्रही होता. पटेल यांचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून श्रीनिवासन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेटही घेतली. त्याच दिवशी गांगुलीने देखील शहा यांची भेट घेऊन अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार असल्याचे सांगितले. अनुराग ठाकूर यांचा गट गांगुलीच्या पाठीशी असल्याचे उघड झाल्याने गांगुलीच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
गांगुलीला अवघ्या 10 महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. मात्र, गांगुलीला प्रशासकीय कामकाजाचा उत्तम अनुभव आहे. बंगाल क्रिकेट संघटनेची जबाबदारी त्याने चांगली सांभाळली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीमुळे क्रिकेटची घडी विस्कटल्याचा अनेकांचा आरोप आहे. ही घडी पुन्हा बसविण्यासाठी गांगुलीसारखा प्रशासक हवा, असे अनेकांचे मत होते.
गेल्या काही वर्षांपासून मंडळावर क्रिकेटशी संबंध नसलेल्या लोकांचा वरचष्मा राहिला आहे. शरद पवार, एन. श्रीनिवासन, अनुराग ठाकूर अशा अनेक राजकीय व अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी मंडळाचे अध्यक्षपद भूषवले आहे. गांगुलीच्या रूपाने पुन्हा एक क्रिकेटपटूच मंडळाची धुरा हाती घेतो आहे. त्यामुळे मंडळात एका नव्या युगाची
सुरुवात होईल.