शहराला 45 कोटींचा दिला विकास निधी : आज कोपरगावात सभा
कोपरगाव – कोपरगाव शहरासह मतदारसंघासाठी 321 कोटी रुपयांचा भरभरून निधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे कृतिशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच मिळाल्याने या मतदारसंघाचा विकास करता आला. कोपरगाव शहरासाठी मुख्यमंत्र्यांनी तब्बल 45 कोटी रुपयांचा निधी देऊन विकासाचा नवा उच्चांक गाठला आहे, अशी प्रतिक्रिया आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे नगरविकास खाते असल्यामुळे मी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत, त्यांनी यापूर्वीच्या सभेत दिलेला शब्द पाळत तब्बल 45 कोटी रुपयांचा विकास निधी देऊन कोपरगावच्या विकासाला चालना दिली आहे. त्याचबरोबर निळवंडे ते शिर्डी-कोपरगाव या बंद पाईपलाईनच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी सुद्धा मदत करत कोपरगावचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
ही योजना अंतिम टप्प्यात आहे. त्याचबरोबर निळवंडे धरणाच्या कालव्यावरील लाभभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी निळवंडे कालव्याला भरीव निधी देऊन गेली अनेक वर्षे रखडलेला हा प्रश्न पूर्णत्वास येत आहे. येत्या दीड वर्षात लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना निळवंडेचे पाणी मिळणार असल्याची माहिती यावेळी कोल्हे यांनी दिली.
कोपरगाव शहरासाठी 25 कोटी रुपयांचा भरीव निधी आणूनही पालिकेचे नगराध्यक्ष जनतेची दिशाभूल करून माझ्यावर टीका करीत असतात, अशी खंत व्यक्त करत येत्या काही दिवसांत मतदारसंघातील उर्वरित कामे पूर्ण करून चेहरा-मोहरा बदलणार आहे. अनेक विकास आराखडे तयार केले आहेत. जनतेचे प्रतिनिधी म्हणून त्याला मी प्राधान्य देत असल्याचेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुतीच्या उमेदवार आ. स्नेहलता कोल्हे यांच्या प्रचारासाठी उद्या (दि.11) ते कोपरगावात येणार आहेत. सकाळी 10 वाजता कोपरगाव तहसील कार्यालयाशेजारील मैदानावर ही सभा होईल, अशी माहिती संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी दिली.
ते म्हणाले, गेल्या पाच वर्षांत कोपरगाव मतदार संघात आ. कोल्हे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांमुळे पक्षाने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तरी जास्तीत जास्त मतदारांनी सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपचे प्रांतिक सदस्य ऍड. रवीकाका बोरावके, तालुकाध्यक्ष शरद थोरात, सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, कैलास जाधव, तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, रिपाइंचे दीपक गायकवाड, जितेंद्र रणशूर, रासपचे तालुकाध्यक्ष नंदकुमार जेजूरकर, भाजप महिला तालुुकाध्यक्षा योगिता होन यांच्यासह सर्व मित्रपक्ष पदाधिकाऱ्यांनी केले आहे.