राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचा राज्य सरकारवर आरोप
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचार सभांना सुरूवात झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करत राज्य सरकारवर टीका केली आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारने राज्याचे चित्र बिघडवून ठेवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने राज्यावर चार लाख कोटी रुपयांचे कर्ज करून ठेवले आहे. यापैकी किती रक्कम विकासासाठी खर्च केली, याबद्दल न बोललेलेच बरे, असे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी युती सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप केला.
महाराष्ट्र एकेकाळी देशात अत्यंत महत्त्वाचे राज्य होते. वेगवेगळ्या क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर होते. पण गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राचे चित्र ज्यांनी बिघडवले. त्यांच्या हातून सत्ता काढून घेण्याची वेळ झाली असल्याचे जनतेला आवाहन एका प्रचार सभेदरम्यान शरद पवार यांनी केले.
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राज्यावर चार लाख कोटी रुपयांचे कर्ज करून ठेवले आहे. यापैकी किती रक्कम विकासासाठी खर्च केली ते न बोललेलेच बरे. पण सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यातील शेतकरी कर्जबाजारी झाला. त्यातूनच राज्यात 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. एवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेली कुटुंबेही उद्वस्त झाली आहेत, याकडे शरद पवार यांनी लक्ष वेधले.
भाजपचे सरकार सामान्य लोकांसाठी नाही तर मोठ्या लोकांसाठी चालवले जाते, असा आरोप करीत ते म्हणाले, सरकार खरंच जागरूक असते तर त्यांनी जेट विमान कंपनी बंद पडू दिली नसती. या कंपनीवर लाखो लोकांचे आयुष्य अवलंबून होते. पण त्याकडे सरकारने साफ दुर्लक्ष केले.