एआयएमआयएमचे अध्यक्षअसदुद्दीन ओवेसींचा सरसंघचालकांना सवाल
नवी दिल्ली : मॉब लिंचिंग ही पद्धत भारतीय नसल्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या दाव्याला एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर दिले आहे. मोहन भागवत यांना माहिती पाहिजे की भारतात मॉब लिचिंग होते. दिल्लीतल्या रस्त्यावर हजारो शिखांना मारण्यात आले. अजून त्यांना न्याय मिळालेला नाही. ते मॉब लिंचिंग नव्हते का, असा सवाल ओवेसी यांनी केला आहे.
LIVE: Barrister Asaduddin Owaisi addressing the people of Parbhani, Maharashtra. https://t.co/8qHPRW8JT8
— AIMIM (@aimim_national) October 9, 2019
मॉब लिचिंग हा विदेशी धर्मग्रंथातून हा शब्द आला आहे. हा शब्द भारतात कसा रूढ झाला, हे शोधण्याची गरज आहे. जमावाकडून होणाऱ्या हत्येसाठी लिंचिंग या शब्दाचा वापर करण्यामागे षड्यंत्र आहे. हिंदू समाजाला बदनाम करून अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे, असे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले होते. मोहन भागवत यांच्या विधानाचा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी परभणी येथे झालेल्या प्रचार सभेत समाचार घेतला.
ओवेसी म्हणाले, आरएसएसचे मोहन भागवत म्हणतात, मॉब लिंचिंग भारतात होत नाही. बाहेरील देशांशी याचा संबंध आहे. मोहन भागवत यांनी माहिती करून घेतले पाहिजे की भारतात मॉब लिंचिंग होत. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीतल्या रस्त्यांवर हजारो शिखांना मारण्यात आले. मारणारे मुसलमान होते का? जे शिख चालत होते, त्यांना गळ्यात पेटलेले टायर टाकून मारण्यात आले. आरएसएसच्या लोकांनो, ते मॉब लिंचिंग नव्हतं का? ते कुणी केले ते तुम्हाला माहित आहे. त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही,असे ओवेसी म्हणाले.