शिराळा – शिवाजीराव देशमुख व शिवाजीराव नाईक गटाच्या एकीने भाजपची ताकत वाढली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी धसका घेतला असल्याचे मत महायुतीचे उमेदवार शिवाजीराव नाईक यांनी व्यक्त केले. कासेगाव ता. वाळवा येथे झालेल्या जिल्हा परिषद गटातील भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. सत्यजित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, मतदारसंघात झालेली भरघोस विकासकामे, रबिवलेल्या योजना यामुळे सर्वसामान्य जनता समाधानी आहे. युती सरकारने वाकुर्डे योजनेची पूर्ती केल्यामुळे शेतकरी समाधानी आहे. मतदारसंघात सगळीकडे भाजपमय वातावरण असल्याने विरोधक मतदार संघांमध्ये फिरून कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज पसरवत आहेत. मात्र अशा प्रकाराला कुठेही थारा मिळणार नाही.
सत्यजित देशमुख म्हणाले, आम्ही मतदार संघाला एक कुटुंब मानून काम करत आलो आहे. देशमुख साहेबांच्या विचारांचा वारसा आणि त्यांच्या महनीय कार्याची शिदोरी आमच्या पाठीशी आहे. विरोधक आता विकासात्मक मुद्दे नसल्याने साप म्हणून भुई धोपटत आहेत. बैठकीस राहुल पाटील, जयकर कदम, डॉ. पाटील, एस. के. पाटील, दत्ता पाटील, भीमराव पाटील, शंकर बागल, राजकुमार पाटील, विजय महाडिक, जयसिंग उथळे उपस्थित होते.