अजित पवार यांचे उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यांवर टीकास्त्र
पुणे – सरकारमध्ये असतानाच शिवसेनेने 10 रुपयांत थाळी द्यायची होती. कर्जमाफी करायची होती, तेव्हा कुणी अडवले होते का? असा सवाल करत निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना पोकळ आश्वासने देत असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. दरम्यान, आघाडीचे 175 पेक्षा जास्त आमदार निवडून येतील, असा दावा पवार यांनी केला.
निवडणुकीच्या निमित्ताने पवार यांनी आठही विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आजी-माजी नगरसेवक, कार्यकारिणी सदस्य, विविध सेलच्या प्रमुखांची बैठक घेतली. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दसरा मेळाव्यात दहा रुपयांत थाळी, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊन त्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा केली होती. त्यावर पवार म्हणाले की, राज्यात पाच वर्षे भाजप-शिवसेनेचे सरकार होते, दोन्ही पक्षाचे मंत्री होते, तरी राज्यात अद्याप कर्जमाफी मिळालेली नाही. उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांच्या डोळ्यांतले पाणी हे मगरीचे अश्रू अशी टीका केली होती.
त्यावर माझा स्वभाव जनतेला माहिती असून, मी रडणारा किंवा पळून जाणारा माणूस नाही. त्यामुळे माझे अश्रू तपासण्यापेक्षा युती कशी टिकेल, ते पाहा असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या मित्रत्वाचे नाते उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे केले जात आहे. त्यावर कुणी कितीही गप्पा मारल्या तरी, 145 ची मॅजिक फिगर गाठणारा पक्षच मुख्यमंत्रिपद आणि मंत्रीपद कोणाला द्यायचे ते ठरवेल, आघाडीत हुकूमशाही नसून, लोकशाही पद्धतीने सर्व आमदार मुख्यमंत्री ठरवतील, असेही पवार यांनी सांगितले.