कोल्हापूर – राजकीय विद्यापीठ म्हणून राज्यभर ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघात आता खालच्या पातळीच्या राजकारणाचा कळस झाला आहे. कागलचे भाजपचे अपक्ष उमेदवार समरजीत घाटगे यांनी अर्ज मागे घ्यावा, म्हणून त्यांच्या आईला फोनवरून धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे कोल्हापुरातल्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात नेहमीच चुरस असलेला मतदारसंघ म्हणून कागला विधानसभा मतदारसंघाला ओळखले जाते. सतत वेगळ्या राजकीय खेळयांमुळे हा मतदारसंघ चर्चेत असतो. इथले राजकारणीही प्रगल्भ असल्याचे मानल जाते. मात्र या घटनेमुळे ओळखीला गालबोट लागले आहे. कागलमध्ये विधानसभा निवडणुकीच वातावरण तापलेल असतानाच अपक्ष उमेदवार समरजीतराजे घाटगे यांच्या मातोश्री सुहासिनीदेवी यांना फोन करून धमकावण्यात आले आहे. समरजीतराजेंनी अर्ज मागे घ्यावा, यासाठी या धमक्या होत्या. या धमक्यांमुळे सुहासिनीदेवींची तब्येत खालावल्यानंतर ही बाब समोर आली. रात्री उशिरा याबाबत शाहूपुरी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, याबाबत सध्या तपास सुरु आहे. या मागे कोण आहे याचा तपास सुरु आहे. मात्र या धमक्यांमुळे घाटगे कुटुंबाचा जीव धोक्यात आला आहे. या प्रकारामुळे कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापले आहे.