राजगुरूनगर येथील सभेत शरद बुट्टेपाटील यांचे प्रतिपादन
राजगुरूनगर – आजी-माजी आमदार एकमेकांचे उट्टे काढत आहेत; मात्र विकासासाठी ते पुढे येत नाहीत. त्यामुळे जनतेत त्यांच्याबद्दल नाराजी आहे. अतुल देशमुख यांना संपूर्ण तालुक्यात विकासाच्या मुद्द्यावर तरुणांसह तालुक्यातील नागरिकांचा पाठिंबा असल्याने त्यांचा विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन जिपचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी राजगुरुनगर
येथे केले.
राजगुरूनगर येथे अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांचा उमेदवारी अर्ज भरते समयी झालेल्या जाहीर सभेत गटनेते शरद बुट्टे पाटील बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे नेते अमोल पवार, समितीचे सदस्य दिलीप मेदगे, कैलास गाळव, राजगुरूनगरचे नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, आळंदीच्या नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, नगरसेवक संदीप रासकर, अजय चव्हाण, मनोहर सांडभोर, संपदा सांडभोर, भाजप महिला अध्यक्षा क्रांती सोमवंशी, संदीप सोमवंशी, कालिदास वाडेकर यांच्यासह भाजप कार्यकर्ते, तालुक्यातील तरुण वर्ग महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
शरद बुट्टे पाटील म्हणाले की, तालुक्यात केवळ हेव्यादाव्याचे राजकारण सुरु आहे आमची लढाई विकासाच्या मुद्द्यावर आहे. अतुल देशमुख एक शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे एक सामान्य कुटुंबातील मुलगा जर आमदार होण्यासाठी पुढे आला आहे म्हणून सर्वसामान्य जनतेने त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. हेवे दावे करून ही निवडणूक लढवायची नाही तर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढविणार आहेत. जनतेला तिसरा पर्याय हवा आहे.
हा तिसरा चांगला पर्याय अतुल देशमुख आहे. त्यांची उमेदवारी आम्ही सर्वांनी स्वीकारली आहे. हेवेदाव्याचे राजकारण संपविण्यासाठी अतुल देशमुख यांच्या सोबत राहून या निर्णयाचे साक्षिदार नव्हे. तर साथीदार व्हा, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, देशमुख निवडणुकीच्या मैदानात उभे राहिल्याने आमदार गोरे, माजी आमदार मोहिते यांच्यापेक्षा देशमुख यांची मोठी ताकद वाढली आहे. याचा प्रत्यय त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना झालेल्या जोरदार शक्ती प्रदर्शनातून जनतेसमोर आला आहे.
आजी-माजी आमदारांचा एकच उपक्रम आहे, दुसऱ्यांच्या मंजूर कामांचे श्रेय लाटायचे. विद्यमान आमदारांनी तालुक्याच्या विकासासाठी किती पैसे आणले. आम्ही किती पैसे आणले याचे मोजमाप केले तर आम्ही पुढे आहोत. भाजप तालुक्यात वाढवला; मात्र येथील खासदार, आमदार आमच्यावर नाराज आहेत. केवळ नागरिकांना पत्र देऊन विकास होत नाही. तर जनतेचे प्रश्न सोडविले पाहिजे होते; मात्र तसे झाले नाही. खड्ड्यात नेणारा आमदार ठेवायचा की आमच्या सारख्या विकास करणाऱ्या कार्यकर्त्या मागे जायचे हे जनतेने ठरवावे. त्यामुळे आता माघार नाही.
– अतुल देशमुख, अपक्ष उमेदवार, खेड-आळंदी