उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उरले केवळ दोन दिवस
पिंपरी – उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघे काही तास उरले आहेत. उद्या (गुरुवार) पासून प्रमुख पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होईल. त्यानंतरच खऱ्या लढतीचे चित्र स्पष्ट होईल. जोरदार शक्तीप्रदर्शन करीत अर्ज दाखल करण्याची तयारी महायुतीच्या उमेदवारांनी केली आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अद्याप यादी जाहीर न झाल्याने या पक्षाच्या इच्छूकांकडून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने राजकीय आखाडा रंगणार आहे.
महायुतीने तीनही विद्यमान आमदारांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. शहरातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून रात्री उशिरापर्यंत उमेदवार जाहीर करण्यात आले नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. उमेदवारी अर्ज वाटप सुरू झाल्यानंतर प्रमुख पक्षांच्या इच्छुकांनी पक्षाच्या नावाने उमेदवारी अर्ज नेले आहेत. तर काहींनी अपक्ष म्हणून अर्ज नेत बंडखोरीचा पर्याय खुला ठेवला आहे.
प्रमुख पक्षांकडून उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार विलास लांडे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारीला नकार घंटा दर्शविली आहे. तर माजी आमदार अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी प्रतिक्षेत आहेत. हे दोघेही उद्या अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
याखेरीज भाजप, शिवसेनेच्या काही आजी-माजी नगरसेवकांनी अर्ज नेले आहेत. ते अर्ज दाखल करणार का, याबाबतही राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. काही इच्छुकांनी अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करत आपले पत्ते “ओपन’ करण्याची तयारी सुरू केली आहे. उमेदवारी अर्जांची छाननी 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 7 ऑक्टोबरपर्यंत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात शेवटपर्यंत कोण टिकणार हे त्याचवेळी स्पष्ट होणार आहे.