औरंगाबाद मध्य हा विधानसभा मतदारसंघ 2014 पासून चांगलाच चर्चेत आला आहे. नांदेडमार्गे मराठवाड्यात शिरकाव करणाऱ्या “एआयएमआयएम’ पक्षाने मागील वेळी एकाच वेळी शिवसेना आणि भाजपला या मतदारसंघातून हादरे दिले. त्यावेळी युती नसल्याने मतविभाजनाचा फटका या दोन्ही पक्षांना बसला. त्यामुळे इम्तियाज जलील यांचा विजयमार्ग सुकर झाला. त्यानंतर महापालिका निवडणुकीत या मतदारसंघातून तब्बल 11 नगरसेवक “एमआयएम’चे निवडून गेले आहेत. तर, लोकसभा निवडणुकीतही इम्तियाज जलील यांना या मतदारसंघातून तब्बल 99,450 मते मिळाली आहेत. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत “एमआयएम’चा गड कायम राहतो, की तेथे पुन्हा शिवसेना वर्चस्व मिळवते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
एकेकाळी औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. पण, एमआयएमने 2014 मध्ये शिवसेनेला पाणी पाजले आहे. त्यामुळे आता शिवसेनेने पुन्हा या मतदारसंघातून लढण्याची तयारी सुरू केली असून 2014मध्ये शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेले किशनचंद तनवाणी यांना पुन्हा शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे असून तनवाणी यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तसं पाहिलं, तर या मतदारसंघाचा इतिहास फारच उलथापालथीचा राहिला आहे. कारण, 2009 मध्ये या मतदारसंघात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रदीप जैस्वाल यांनी बंड केले. त्यांनी स्वतंत्र शहर प्रगती आघाडी स्थापन करून अपक्ष निवडणूक लढविली. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार विकास जैन यांचा पराभव केला होता. 2014 मध्ये शिवसेनेने जैस्वाल यांना पक्षात घेऊन तिकीट दिले. याचवेळी भाजपनेही स्वबळाच्या माध्यमातून किशनचंद तनवाणी यांना उभे केले. आता किशनचंद तनवाणी पुन्हा शिवसेनेत गेले असून उमेदवारीसाठी त्यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. या मतदारसंघात सर्वांत जास्त म्हणजे 11 नगरसेवक भाजपचे, शिवसेनेचे अपक्षांसह 10 नगरसेवक आहेत. भाजपने या मतदारसंघात पाच वर्षांमध्ये बरीच प्रगती केली आहे.
2010 मध्ये भाजपचे फक्त चार नगरसेवक होते. आता ही संख्या 11 आहे. दोन स्वीकृत सदस्यही आहेत. पाच वर्षांमध्ये भाजपने इनकमिंगवर भर दिला. माजी नगरसेवकांचीही फौज उभी केली. पण, हा मतदारसंघ युतीमध्ये भाजपकडे नाही. स्वबळाची वेळ आल्यास हे बळ उपयोगात येईल, असा विचार भाजपने केला आहे. मध्य मतदारसंघात चार अपक्षही आहेत. त्यांचा कौलही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यातील एक अपक्ष कीर्ती शिंदे स्वत: रिंगणात आहेत. तर, शिवसेनेचे 2004 मध्ये 11 नगरसेवक होते. अपक्षांसह आज ही संख्या 10 आहे. त्यांचे अनेक माजी नगरसेवक पक्ष सोडून भाजपमध्ये गेले आहेत.
एमआयएमसमोर आव्हान कोणते?
जावेद कुरैशी बंडाच्या तयारीत आहेत. हे बंड थोपविणे एमआयएम पक्षासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. यानंतर वंचित बहुजन आघाडी अमित भुईगळ यांना उमेदवारी देणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस कदीर मौलाना यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखविण्याच्या तयारीत आहे. मागासवर्गीय, अल्पसंख्याक मतांचे विभाजन मोठ्या प्रमाणात होणार आहे. हे थांबविणे एमआयएम पक्षाला सोपे नाही.