कार्यकर्ते लागले कामाला; आरतीच्या निमित्ताने नेते साधणार जनसंपर्क
गणेशोत्सवाप्रमाणेच उमेदवारांकडून यंदा नवरात्रोत्सवातही प्रचाराची पेरणी होणार आहे. त्या दृष्टीने सार्वजनिक मंडळांना “पॅक’ करून नवरात्रोत्सव “हायजिक’ करण्यासाठी नेतेमंडळीकडून व्यूहरचना आखण्यात आली आहे. यंदा मंडळांच्या संख्येतही वाढ झाल्याचे चित्र आहे.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वत्र राजकीय वातावरण निर्माण झाले आहे. घटस्थापनेनंतर आता अनेक इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे ऐन नवरात्रोत्सवात राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांना आकर्षित करून घेण्यासाठी सढळ हस्ते देणग्या द्यायचे धोरण राबवले होते. आता तर उमेदवारी अर्ज दाखल होणार असल्याने नवरात्रोत्सवातही उमेदवारांकडून “सार्वजनिक मंडळांसाठी काय पण’, ही भूमिका राहणार असल्याचे दिसते.
गणेशोत्सवानंतर तरुणाईला वेध लागतात ते नवरात्रोत्सवाचे. गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवातही धमाल असते. तरुणाईच्या आनंदाला उधाण येते. त्याचा पुरेपूर फायदा उठवण्याचे प्रयत्न उमेदवारांकडून होणार आहेत. काही उमेदवारांनी नवरात्रोत्सव मंडळाच्या मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांकडे दिली आहे.
इच्छुक उमेदवारांनी गणेशोत्सवात नागरिकांना आरतीची पुस्तके, मंडळांवर ध्वनिक्षेपक यंत्रणा, विद्युत रोषणाईचे साहित्य, महाप्रसादासाठी साहित्य, टी शर्ट अशा वस्तूंची खैरात केली होती. नवरात्रोत्सवातही मंडळांमध्ये देवीची आरती, महाप्रसाद, पूजा, दांडिया, गरबा नृत्याचे संयोजन अशा उपक्रमांचे नियोजन इच्छुक करताना दिसत आहेत. निवडणुकीमुळे गावागावातील मतदारांना खूश करण्यासाठी अनेक युक्त्या लढवल्या जात आहेत. प्रचार यंत्रणा राबवतानाच नवरात्रोत्सवासाठी इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्यातून या उत्सवातील दांडियाला यंदा राजकीय रंग भरणार, हे नक्की.
मंडळांच्या कार्यकर्त्यांनी दिले आरतीचे निमंत्रण
जिल्ह्यातील बहुतेक विधानसभा मतदारसंघांमधील इच्छुकांची वर्गवारी करून मंडळांनी नेतेमंडळींना देवीच्या आरतीचे निमंत्रण धाडले आहे. या उत्सवात सहभागी असलेल्या तरुणाईला व नवमतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी नेते प्रयत्न करत आहेत तर “ये मौका फिर न आयेगा’, असे म्हणत मंडळांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.