लातूर जिल्ह्यातील बाजारपेठेच्या दृष्टीने सर्वांत मोठे शहर, कर्नाटक, तेलंगणा राज्यांच्या सीमा असूनही रस्ते सुविधा अत्यंत बकाल आहे. गेल्या काही वर्षांत येथून राष्ट्रीय महामार्ग बांधकाम सुरू आहे. पण, इतर राज्य मार्ग खड्ड्यातच आहेत. रेल्वे, एसटी अशा दळणवळण सेवा, शैक्षणिक वातावरण इतकं सर्व असूनही या मतदारसंघाचा बकालपणा काही कमी होत नाही. राज्यकर्त्यांनी या मतदारसंघाला नेहमीच सापत्न वागणूक दिली आहे. रोजगाराच्या दृष्टीने येथे कोणतेही नवीन उद्योग नाहीत. त्यामुळे स्थलांतर करणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे.
2009च्या पुनर्रचनेनंतर सातत्याने भाजपकडे राहिलेला हा मतदारसंघ विकासाच्या दृष्टीने पिछाडीवरच राहिला आहे. या मतदारसंघातील मतांची गणिते पूर्णत: जाती-पातीवर अवलंबून आहेत. बौद्ध, मुस्लीम आणि लिंगायत समाजाची मते येथे जास्त असली, तरी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोठे जाळे आहे. त्याचा फायदा भाजपला मिळत आला आहे. दुसऱ्या बाजूला कॉस्मोपोलिटियन अशी येथील सामाजिक रचना आहे. उदगीर-जळकोट या दोन तालुक्यांची जोडणी करून तयार करण्यात आलेला हा मतदारसंघ असून सुधाकर भालेराव येथून निवडून आले आहेत. प्रामुख्याने शेती आणि व्यापार हे दोन प्रमुख व्यवसाय या मतदारसंघात असूनही त्यांच्या उन्नतीसाठी लोकप्रतिनिधींकडून फारसे प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे काही भाग वगळता ग्रामीण भागात नेहमीच दुष्काळजन्य स्थिती असते.
आरोग्य सेवेच्या बाबतही ग्रामीण भागात समाधानाचे वातावरण नाही. कर्नाटक, तेलंगणा राज्य रस्ता, उदगीर-अहमदपूर-नांदेड, उदगीर-जळकोट आणि कोणत्याही शहराकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट आहे. रस्ते व महामार्ग विकासात खूपच मागासलेला उदगीर मतदारसंघ कृषी आधारित व्यवसायावर चालतात. मात्र त्यांना गती मिळत नाही. रोजगाराच्या शोधात या भागातून मोठ्या प्रमाणावर बेरोजगारांचे लोंढे हे मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळुरूकडे जातात. रस्ते, पाणी, वीज, शैक्षणिक, आरोग्यविषयक सोयी-सुविधा, व्यापार, उदयोग, कारखानदारीच्या अभावाने उदगीर हा लातूर जिल्ह्यातील सर्वांत मोठा तालुका असूनही अतिशय वाईट अवस्थेत आहे. वाढत्या बेरोजगारीकडे कोणाचेही लक्ष नाही. त्यामुळे मतदारांत सातत्याने नाराजीचा सूर असतो. त्यामुळे मतदार सक्षम पर्यायाच्या शोधात आहेत.