आळंदी – वसई येथील तुंगारेश्वर पर्वतावर असलेल्या बालयोगी सदानंद महाराज आश्रमाचे बांधकाम अनधिकृत असल्याचे कारण पुढे करीत पाडल्याच्या निषेधार्थ आळंदीत जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत वारकऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीत शासनाच्या कारवाईचा निषेध केला. आश्रमावरील कारवाई थांबवावी; अन्यथा निवडणुकीवर राज्यभरातील वारकरी बहिष्कार टाकतील असा इशारा देखील देण्यात आला.
जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत पार पडलेल्या बैठकीत मारुती महाराज कुऱ्हेकर, प्रकाश महाराज जवंजाळ, डॉ.नारायण महाराज जाधव, विष्णू महाराज सावकार, आसाराम महाराज बढे, मिलिंद एकबोटे, साध्वी सर्वेश्वरी देवी, नरहरी महाराज चौधरी, वारींगे महाराज, आसाराम खांदवे महाराज, माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, पुरुषोत्तम महाराज पाटील, प्रवीण महाराज लोळे, पंडित महाराज क्षीरसागर, किरण इंगोळकर, आदिनाथ महाराज, सुभाष पवार, वहिले महाराज, पांडुरंग शितोळे महाराज, पोलीस पाटील बाबासाहेब पाटील आदी उपस्थित होते. बैठकीत अनेक मान्यवरांनी निषेध केला. राज्यभरातून विविध संस्था, मंडळे यांच्या मार्फत पत्रव्यवहार करीत कारवाई थांबविण्याची मागणीचा कारवाई न थांबल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा, न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणात शासनाला भाविकांच्या हिताची बाजू मांडण्याची भूमिका घेण्यास भाग पाडण्याचा, वेळ पडली तर आंदोलन, उपोषण करण्याचा विचार यावेळी करण्यात आला.