वैभवशाली दिवस पाहिलेल्या जिल्हा कॉंग्रेसची अवस्था “जिथे फुले वेचली, तिथे गोवऱ्या वेचायची वेळ आली,’ अशी झाली आहे. यशवंतराव चव्हाण, किसन वीर यांनी कॉंग्रेसचा बालेकिल्ला बनविलेल्या सातारा जिल्ह्यात कॉंग्रेस औषधालाही उरणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताकदीला उतरती कळा लागली. जनसंघाची पणती पेटविण्यासाठी कोणीच पुढे येऊ शकत नव्हते, अशा जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष मातब्बर होऊ लागला. शिवसेनेचा आवाजही वाढू लागला. हे सारे एकाएकी घडले नाही.
सातारा – कॉंग्रेस नेतृत्त्वाचा नाकर्तेपणा, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील ठराविक नेत्यांची मक्तेदारी, संघटनात्मक बांधणीचा अभाव असूनही शिवसेनेला मिळणारी संधी आणि सत्तेचा फायदा घेण्याची भाजपची मुत्सद्देगिरी यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाला अविश्वसनीय कलाटणी मिळाली. राजघराण्यातील नेत्यांच्या धरसोड वृत्तीने त्यात भर टाकली. राज्याच्या राजकारणात प्रभावी असणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण एकाकी पडताना दिसत आहेत. तर दुसरीकडे खासदार उदयनराजे भोसले महिनाभरापासून कुंपणावर आणि रामराजे नाईक निंबाळकर उंबरठ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकीय हतबलतेच्या रंगात विकासाचा मार्ग मात्र धूसर होत चालला आहे, हे लोकांच्या दृष्टीने फक्त दुर्दैवी आहे.
“राष्ट्रवादी’चे जहाज भरकटलेले!
कॉंग्रेसची ही अवस्था असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसही अडचणीत आहे. राजघराण्यातील तीन नेत्यांच्या सुंदोपसुंदीत पक्ष अडकला. तरीही तेच तिन्ही नेते पक्षापासून दूर जाण्याच्या भूमिकेत राहिले. त्यापैकी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजप गाठली. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर पक्ष सोडण्याच्या उंबरठ्यावर आहेत. खासदार उदयनराजे महिनाभरापासून कुंपणावर आहेत. भाजपमध्ये जायचे की नाही, या संभ्रमावस्थेतून ते बाहेरच येत नाहीयेत. त्यामुळे भरकटलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला किनारा मिळण्याची आशाही संपुष्टात येऊ लागली आहे. उदयनराजेंचे दबावतंत्र नेहमीच यशस्वी झाले आहे. यावेळी मात्र ते रेंगाळलेले आहे. नेहमी लोकांच्या भावनेला हात घालत पक्षालाही बाजूला सारणाऱ्या उदयनराजेंना निर्णय घेता येत नाही, अशी वेळ आली आहे. त्यामुळेच त्यांच्या पक्षबदलाबाबत आता लोकांच्या भावनाही बोथट होऊ लागल्या आहेत. जिल्ह्याच्या राजकारणातील हतबलता जिल्ह्याला कुठे नेऊन ठेवणार आहे, एवढाच प्रश्न लोकांच्या मनात आता उरला आहे.
भाजपची दिशा बलाढ्य होण्याकडे…!
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही कॉंग्रेसच्या मक्तेदारीला सुरूंग लावण्याचे काम प्रामुख्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. गेल्या पाच वर्षांपासून जिल्ह्यात फिरून त्यांनी केलेली पेरणी आता उगवू लागली आहे. दोन्ही कॉंग्रेस पोखरून भाजपची ताकद वाढविण्यात त्यांनी यश मिळविले. ही ताकद विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात कितपत यशस्वी होते, ते महत्त्वाचे ठरणार असले तरी नामोनिशाण नसलेल्या भाजपला बलाढ्य करण्याचे त्यांचे डावपेच दोन्ही कॉंग्रेसला नेस्तनाबूत करत चालले आहेत. एवढेच नव्हे तर वाई, कराड उत्तर, कोरेगाव आणि कराड दक्षिणमधील उमेदवार जाहीर करून भाजपने आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत. याउलट शिवसेना सत्तेत असूनही “जैसे थे’ वाट चालत आहे. पालकमंत्रिपद असूनही संघटनेला कोणतीही ताकद देता न आल्यामुळे भाजपच्या आधारावरच शिवसेना आपली वाटचाल चालण्याची चिन्हे आहेत.