जयंत पाटील यांचा दावा
नागपूर: भाजप आणि शिवसेना या सत्ताधारी पक्षांचे अनेक इच्छूक उमेदवार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संपर्कात आहेत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून साम, दाम, दंड, भेद अशास्वरूपाच्या राजकारणाचा अवलंब होत असल्याने संपर्कात असलेल्यांची नावे योग्य वेळी जाहीर करू, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी म्हटले.
राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर आली असतानाच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या विरोधी पक्षांना मोठी गळती लागल्याचे चित्र आहे. त्या पक्षांच्या अनेक नेत्यांनी सत्ताधारी गोटाची वाट धरली आहे. त्यापार्श्वभूमीवर, भाजप आणि शिवसेनेचे अनेक इच्छूकही राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी उत्सुक असल्याचा दावा पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला.
विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मागील तीन ते चार वर्षांपासून तयारी करणारे सत्ताधारी गोटातील अनेक जण माझ्या संपर्कात आहेत. पण, त्यांची नावे आताच उघड करणार नाही, अशा शब्दांत पाटील यांनी राजकीय सस्पेन्स कायम ठेवणे पसंत केले. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतून होणाऱ्या इनकमिंगमुळे भाजप आणि शिवसेनेतील काही इच्छूक उमेदवारांची कोंडी झाली आहे. त्यातून तेही पक्षबदलाचा निर्णय घेऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत.