कोल्हापूर – गेल्या 72 तासांपासून कोल्हापूर जिल्ह्यात धूमचक्री सुरू ठेवली आहे. पश्चिम महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाने थैमान घातले होते. महापुराने अनेकांचे संसार उद्धवस्त झाले होते. आता हळुहळू येथील जनजीवन पूर्वपदावर येत आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून येथे पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र आता पुन्हा एकदा येथे पाऊस सक्रीय झाला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने पंचगंगेची पाणी पातळी 33 फुटांवर गेली असून 52 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर जिल्ह्यात 9 घरांची पडझड होऊन लाखो रुपयांच नुकसान झालं आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील धरणं पाणलोट क्षेत्रात तुफान अतिवृष्टी होत आहे. राधानगरी, तुळशी, कासारी, कडवी, कुंभी, पाटगाव, चिकोत्रा, चित्री, घटप्रभा प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. पुढील 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राधानगरी सह जिल्ह्यातील 13 प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. तर सर्वच प्रकल्पातून पाण्याच विसर्ग सुरू करण्यात आला आहे. राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडे झाले आहेत. पावसाचा जोर कायम असल्याने 52 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
राधानगरी धरणाच्या स्वयंचलित 4 खुल्या दरवाज्यामधून 7112, कोयनेचे दरवाजे 10 फुटावरुन साडेपाच फुटावर करण्यात आले आहेत. त्यामधून 49804 तर अलमट्टी धरणामधून 185000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे.