कराड – विमानतळाच्या हद्दीत प्रवेश मिळावा, तसेच विमानतळाबाबत आवश्यक माहिती द्यावी, यासाठी वारुंजी, केसे, मुंढे, पाडळी या गावातील ग्रामस्थांनी मोर्चा काढून विमानतळाच्या गेटवरच ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन बाधित शेतकऱ्यांशी चर्चा केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करू असे आश्वासन दिल्याने आजचे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित केले.
विस्तारीकरण वाढ रद्द झाली पाहिजे, यासाठी 2011 पासून श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. या विस्तारवाढीमध्ये बागायत क्षेत्र जाणार असून येथील शेतकरी भूमिहीन होणार आहेत. हे विमानतळ विस्तारीकरण रद्द करण्यासाठी गेले पंधरा दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू आहे. आज विमानतळ विस्तारवाढ विरोधी कृती समितीने विमानतळ व्यवस्थापक कुणाल देसाई यांना निवेदन दिले.
मुख्यमंत्रीच्या बैठकीवेळी जी चर्चा होईल, त्यासंदर्भात या विमानतळाबाबत माहिती मिळण्याची मागणी व्यवस्थापनाकडे केली आहे. त्यामध्ये 2011 पासून आतापर्यंत किती व कोणती विमाने व हेलिकॉप्टर्स येथे उतरली. या विमानतळावर विमान उतरताना एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला डोंगरवजा टेकड्या असल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या अडचण येईल का?
यासंदर्भात रिस्क फॅक्टर चा काही अभ्यास झाला आहे का? असल्यास त्याची माहिती द्यावी, अशी विनंती केली आहे. तसेच या विमानतळाची परिचालन, दुरुस्ती देखभाल आणि कर्मचारी यांचा पगार व विमानतळतून होणारी जमा, याची माहिती मागितली आहे. ही माहिती मिळावी, यासाठी शुक्रवारी सकाळी विमानतळ बाधित शेतकऱ्यांनी विमानतळ आवारात ठिय्या आंदोलन सुरू केले.
यावर विमानतळ व्यवस्थापनाने लगेच पत्रक काढून वरील प्रश्नांपैकी काही प्रश्नांची बाधितांना उत्तरे दिली आहेत.
त्यापैकी 2011 पासून या विमानतळावर साडेपाचशे विमाने, हेलिकॉप्टर उतरली आहेत. तसेच या विमानतळावर विमान उतरताना डोंगर व टेकड्यांमुळे कोणताही धोका निर्माण होत नसून विमानाचा रनवे कमी असल्याने येथे अडचणीचे होत आहे, अशी माहिती या पत्रकातून दिली आहे. या व्यतिरिक्त अन्य जी माहिती मागितली होती. त्याबाबत मुंबई ऑफिसमधून घेण्याची विनंती देखील यावेळी करण्यात आली आहे.
विमानतळ बाधितांच्या प्रश्नांवर अनेक बैठका झाल्या. मात्र यावर ठोस असा तोडगा निघालेला नाही. सदरचे विमानतळ धोकादायक असल्याचे काही अधिकारी खासगीत सांगत आहेत. आमच्या प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आमचे प्रश्न सोडविण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत श्रमिक मुक्ती दलाचा उमेदवार उभा करणार आहे.
दाजी जमाले, सदस्य कृति समिती.