“मन की बात’तून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन”
मुंबई: जन्माष्टमीच्या निमित्ताने आणि महात्मा गांधींच्या 150व्या जयंतीनिमित्त बापूंची आठवण काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मन की बात’ कार्यक्रमाला सुरुवात केली. गांधीजींचे स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार मोदींनी पुन्हा बोलून दाखवला. तसेच दोन ऑक्टोबर रोजी 150व्या जयंतीनिमित्त गांधींजींना “हागणदारीमुक्त भारत’ समर्पित करु आणि प्लॅस्टिकच्या विरोधात एका जनआंदोलनाला सुरुवात करु, असे आवाहनही त्यांनी केले.
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णयानंतर नरेंद्र मोदी यांनी प्रथमच “मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. एकीकडे सुदर्शन चक्रधारी मोहन आहे, तर दुसरीकडे चरखाधारी मोहन (महात्मा गांधी) आहे. सत्यासोबत गांधींचे जितकं अतूट नाते राहिले तितकंच अतूट नातं लोकांची सेवा करण्यामध्येही राहिले आहे, असे मोदींनी सांगितले.
जन्माष्टमीचा उल्लेख करताना मोदींनी भगवान श्री कृष्ण आणि सुदामाच्या मैत्रीचे उदाहरण दिले. त्यानंतर सध्या देशात अजून एका उत्सवाची तयारी सुरू असून तो उत्सव म्हणजे महात्मा गांधींची 150वी जयंती असे मोदींनी नमूद केले. तसेच, सामान्य व्यक्ती श्रीकृष्णाच्या जीवनातून वर्तमानातील समस्यांवर उपाय शोधू शकतो, असेही मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले, दोन ऑक्टोबर रोजी 150 व्या जयंतीनिमित्त गांधींजींना “हागणदारीमुक्त भारत’ समर्पित करु आणि प्लॅस्टिकच्या विरोधात एका जनआंदोलनाला सुरुवात करु. प्लॅस्टिकची पिशवी मिळणार नाही, आपल्यासोबत कापडी किंवा कागदी पिशवी आणावी, असे अनेक दुकानदार, व्यापारी सांगतात. त्यामुळे प्लॅस्टिकचा वापर कमी होऊन पैसेही वाचतील आणि पर्यावरणाचे रक्षणही होईल. यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान देण्याचे आवाहन मोदींनी केले. गेल्या काही वर्षांपासून आम्ही दोन ऑक्टोबरच्या दोन आठवडे आधीपासून देशभरात “स्वच्छताच सेवा’ हे अभियान सुरु करतो. यंदा हा उपक्रम 11 सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
जागरुकतेअभावी कुपोषणाचा परिणाम गरीब आणि संपन्न दोन्ही प्रकारच्या कुटुंबांवर पडतोय. त्यामुळे याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी सप्टेंबर हा महिना “पोषण अभियान’ महिना म्हणून ओळखला जाईल. तसेच 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त “फिट इंडिया मूव्हमेंट’ सुरु करण्याची घोषणा त्यांनी केली. “मॅन व्हर्सेस वाइल्ड’ या कार्यक्रमामुळे भारतीय संस्कृती, परंपरा, निसर्गाबद्दल असलेली संवेदनशीलता या गोष्टींची जगाला ओळख होईल, असेही मोदी म्हणाले.