श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील वातावरण निवळल्याचे चित्र दिसत असतानाच आता पुन्हा एकदा राज्यातील शांतता भंग करण्यासाठी फुटीरवाद्यांनी शंख फुंकल्याचे दिसत आहे. कारण श्रीनगर येथील संयुक्त राष्ट्रांच्या लष्करी निरीक्षकाच्या स्थानिक कार्यालयावर मोर्चा नेण्याचे आवाहन करणारी भित्तीपत्रके फुटीरतावाद्यांनी काही ठिकाणी लावले आहेत. त्यामुळे आता श्रीनगरमध्ये पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
काश्मीरमधील बहुतांश भागात या आठवड्यात संचारबंदीसह लागू केलेले काही निर्बंध मागे घेण्यात आले होते. त्यामुळे रसत्यावर लोकांची वर्दळ व वाहनांची ये-जा सुरू झाली होती. मात्र, राज्यातील सर्व बाजारपेठा अद्यापही बंद आहेत. कलम 370 रद्द केल्यापासून अठराव्या दिवशीही गुरुवारी इंटरनेट व मोबाईल सेवाही बंद ठेवण्यात आली होती. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याच्या निषेधार्थ लोकांनी मोर्चा काढावा, असे आवाहन करणारी फुटीरतवाद्यांच्या संयुक्त विरोधी समितीची भित्तीपत्रके झळकल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून श्रीनगरमध्ये पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले. लोकांनी लाल चौक व सोनवार येथे मोठ्या प्रमाणावर जमा होऊ नये म्हणून रस्त्यांत बॅरिकेटस् व तारांच्या जाळ्यांचे अडथळे उभारण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे मोक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत.