सोमवारपासून युतीच्या जागावाटपाची चर्चा
मुंबई (प्रतिनिधी) – विधानसभेसाठी युती करताना मित्रपक्षांना जागा सोडून उरलेल्या जागा अर्ध्या-अर्ध्या वाटून घेण्याचे सत्ताधारी शिवसेना आणि भाजपाचे ठरले असले तरी भाजपात अन्य पक्षातून येणाऱ्या आमदारांची संख्या वाढत आहे. त्यामुळे बदललेल्या राजकीय स्थितीमुळे जागावाटपाचे सूत्र बदलले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये शिवसेनेची कोंडी करण्याची रणनीती भाजपाची असल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीत युती करताना मित्रपक्षांना जागा सोडून उरलेल्या जागांचे दोन पक्षात समान वाटप करावे असे ठरले होते. पण नंतरच्या काळात दोन्ही पक्षात बाहेरील बरेच लोक आले आहेत. त्यामुळे स्थानिक समीकरणंही बदलली आहेत. भाजपाचे 122 आमदार असून अपक्ष व बाहेरून पक्षात आलेल्या आमदारांची संख्या विचारात घेता सध्याचे संख्याबळ 133 पर्यंत गेले आहे. त्यामुळे स्वाभाविकच 135 चे सूत्र बदलावे लागेल. दोन्ही बाजूकडे असलेल्या विद्यमान जागा बाजुला काढून उर्वरित जागांचे वाटप होऊ शकते, असे सूचक वक्तव्य करताना बदललेल्या राजकीय स्थितीत शिवसेनेला अर्ध्या जागा सोडणे कठीण असल्याचे संकेत भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेत्यांच्या प्रचारयात्रा सुरू झाल्या आहेत. युती होणारच असे दोन्ही बाजूने ठामपणे सांगितले जात असले तरी अद्याप याबाबतची बोलणी सुरू झालेली नव्हती. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपा युतीतील जागावाटपाची चर्चा पुढच्या आठवड्यात सुरू होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार प्राथमिक बोलणी करणार आहेत. शिवसेनेकडून कोण बोलणी करणार आहे हे अद्याप कळलेले नाही. मात्र, जागा वाटपादरम्यान कुठे पेच निर्माण झाले तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या पातळीवर सोडवले जातील, असेही नेत्याने सांगितले.
महाराष्ट्र विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबर रोजी, तर हरियाणा विधानसभेची मुदत 2 नोव्हेंबर रोजी समाप्त होत आहे तत्पूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. 25 ऑक्टोबरला दिवाळी सुरु होणार असल्याने 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान निवडणूक होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास 15 सप्टेंबरनंतर केव्हाही आचारसंहिता लागू शकते. 2 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरु होत असून गणरायाच्या विसर्जनापूर्वी युतीची प्रतिष्ठापना करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे येत्या सोमवारनंतर युतीची प्राथमिक बोलणी सुरू होईल, असे या नेत्याने सांगितले.
भुजबळ शिवसेनेत, तर राणे भाजपात!
नारायण राणे यांनी आपल्या भाजप प्रवेशाला भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी हिरवा कंदील दिला असून मुख्यमंत्री येत्या चार-पाच दिवसात निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. याबाबत विचारता, शिवसेनेमुळे राणे यांचा आत्तापर्यंत भाजपात प्रवेश झाला नव्हता. पण शिवसेना छगन भुजबळांना पक्षात घेणार असेल तर राणे भाजपात का नाही येऊ शकत, असा प्रतिप्रश्न या नेत्याने केला.