मेणवली – सातारा जिल्ह्यातील कराड, पाटणसह कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुरामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले. पूरग्रस्तांचा संसार पुन्हा सावरण्यासाठी राज्यभरातील विविध सामाजिक संस्था, संघटना यासह अनेक शहरांमधून तसेच खेडोपाड्यांमधून वेगवेगळ्या स्वरुपात मदत दिली जात आहे. या मदती सातारा जिल्हा आघाडीवर असून जिल्ह्यातील गावागावांमधून पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरु आहे. नुकतेच वाई तालुक्यातील धोम ग्रामस्थ मंडळाने कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ गावात जाऊन पूरग्रस्त कुटुंबांना तांदूळ, गहू, कपडे, बिस्किटे, औषध यासह इतर जीवनावश्यक वस्तू मदत म्हणून दिल्या. धोम ग्रामस्थांच्या मदतीमुळे धरणग्रस्त धावले पूरग्रस्तांच्या मदतीला अशी भावना व्यक्त होत होती.
1976 साली कृष्णा नदीवर धोम धरण बांधण्यात आले. या धरणामुळे जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्याचा पाणीप्रश्न मिटला खरा, मात्र धरणाच्या निर्मितीत अनेकांवर बेघर होण्याची वेळ आली. वेळेत पुनर्वसनाचे प्रश्न निकाली लागले नाहीत, त्यामुळे अनेक कुटुंबांची अक्षरश: वाताहात झाली. नुकत्याच येऊन गेलेल्या पूरपरिस्थितीमुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील गावेच्या गावे उद्ध्वस्त झाली. त्या गावांमधील लोकांवरही तात्पुरते का होईना पण दुसरीकडे विस्थापित व्हावे लागले. आणि धोम धरणग्रस्थ विस्थापित होण्याचा कडव्या आठवणींने पुन्हा हळहळले. या जाणीवेतून धोम धरणग्रस्तांनी आपल्या परीने जेवढी जमेल तेवढी मदत करून पूरग्रस्तांचे उद्ध्वस्त झालेले संसार सावरण्यासाठी हातभार लावण्याचा निर्धार केला. नुकते धोम ग्रामस्थ मंडळाने गावातील घराघरातून तांदूळ, गहू, कपडे, बिस्किटे, औषधे यासह विविध जीवनावश्यक वस्तू गोळा केल्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ गावातील पूरग्रस्त कुटुंबियांना ही मदत देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली.
दरम्यान, नगरपरिषदेचे अध्यक्ष कुमार पाटणकर यांच्याकडे ही मदत सुपूर्द करण्यात आली.
विशेष म्हणजे धोम ग्रामस्थांनी जमा केलेली मदत प्रशांत पोळ, मदन पोळ, अरविंद पोळ, रामदास पोळ, सुहास पोळ, प्रकाश पोळ, दीपक पोळ, सुनील पोळ, प्रमोद पोळ, दयानंद पोळ, अशोक मराठे, शिवाजी गायकवाड, अभिजित देशमाने, अशोक हगवणे यांनी शिरोळ येथे जागा पोच केली.