मलठण, (वार्ताहर)- कृषी विभाग महाराष्ट्र शासन व आत्मा पुणे यांचे सहकार्याने “डॉ. पंजाबराव देशमुख जैविक, नैसर्गिक शेती अभियान” अंतर्गत दौंड व पुरंदर या दोन तालुक्यांतील स्थापित गटाचे गट प्रमुख प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमास दोन तालुक्यांतील ८८ शेतकरी बांधवाची उपस्थिती होती.
यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे महेश जाधव यांनी डॉ. पंजाबराव देशमुख जैविक- नैसर्गिक शेती मिशन, सेंद्रिय शेती मान्य व वर्ज्य बाबी, सेंद्रिय शेती प्रमाणीकरण, मानांकनेबद्दल मार्गदर्शन केले. विषय विषेशज्ञ (पीक संरक्षण) डॉ. मिलिंद जोशी यांनी सेंद्रिय शेतीबद्दल समज गैरसमज, पिकांमधील कीड व रोग व्यवस्थापन, जैविक खते याबद्दल मार्गदर्शन केले.
यावेळी पुणे शाश्वत फौंडेशनचे संदीप काकडे यांनी विकेंद्रित जैविक निविष्ठा उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले. सेंद्रिय शेतकरी कांतिलाल नलगे यांनी सेंद्रिय शेतमाल विक्री व्यवस्थापन ब्रँड विकसीत करण्याबाबत मार्गदर्शन केले. अनिकेत यादव यांनी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना, योजना याविषयी मार्गदर्शन केले. प्रकल्प सहायक अल्पेश वाघ यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME), मधमाशी पालन याबद्दल माहिती देत कृषी विज्ञान केंद्रात चालू असणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती दिली.
कार्यक्रमासाठी आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रुपनवर, दोन तालुक्यांतील कृषी विभागाचे कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक उपस्थित होते. प्रशिक्षणाचे नियोजन आणि सूत्रसंचालन अल्पेश वाघ यांनी केले.