खा. रणजितसिंह : पक्षनेतृत्वाने सक्षम कार्यकर्त्यांचे खच्चीकरण केले
खंडाळा – जिल्ह्यात कॉंग्रेसची ताकद मोठी होती, मात्र पक्षनेतृवाने सक्षम कार्यकर्त्यांचे नेहमी खच्चीकरणच केले. याबाबतीत आ. जयकुमार गोरे यांचे उदाहरण बोलके आहे. त्यांच्या संघटन कौशल्याला कॉंग्रेसने वाव दिला नाही. आज आ. गोरे आणि जिल्ह्यातील त्यांचे सहकारी वगळले तर कॉंग्रेसचे अस्तित्व नगण्यच राहील असे मत खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
बोराटवाडीत चार दिवसांपूर्वी जिल्ह्यातील कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या पार पडलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना खा. रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, कॉंग्रेस पक्षाला मोठी परंपरा आहे. जिल्ह्यात कॉंग्रेसची चांगली ताकदही होती. मात्र सध्याच्या पक्षनेतृत्वाने सक्षम कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना कधी ताकदच दिली नाही. कायम त्यांचे खच्चीकरण केले. कर्यकर्ता आणि पदाधिकारी मोठा होवूच दिला नाही.
माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे हे जिल्ह्यात सर्वाधिक पोटॅंशियल असणारे नेतृत्व आहे. मात्र त्यांचेही कायम खच्चीकरण करण्यात आले. त्यांना कॉंग्रेसमध्ये नेहमीच डावलण्यात आले. जिल्ह्यात कॉंग्रेसच्या वाढीसाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. कॉंग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला बळ दिले. कॉंग्रेसचे नेतृत्व मोठे करण्यासाठी त्यांनी कोणतीच पर्वा न करता विरोधी राष्ट्रवादीला अंगावर घेतले. त्या संघर्षात त्यांना खूप काही भोगावे लागले. कोरेगाव, कराड उत्तर मतदारसंघात कॉंग्रेसची ताकद असूनही पक्षनेतृत्वाने लक्ष दिले नाही. आ. गोरेंनीच या भागातील कार्यकर्त्यांना ताकद दिली. आता तर पोपट मेलाय असे कॉंग्रेस कार्यकर्ते जाहीरपणे सांगायला लागले आहेत.
आ. गोरे लवकरच निर्णय घेतील
आ. गोरेंनी मतदासंघाच्या विकासाशिवाय कोणतीच अपेक्षा केली नाही. माण आणि खटाव या कायम दुष्काळी भागातील पाणीयोजनांच्या पूर्ततेसाठी त्यांनी सर्वाधिक प्रयत्न केले. स्वतःबरोबरच जिल्ह्यातील सहकाऱ्यांनाही राजकारणात ताकद देण्यात ते कमी पडले नाहीत. मैत्री कशी करावी, मैत्रीत त्याग कसा करावा हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. विधानपरिषद निवडणूक आणि माझ्या लोकसभा निवडणुकीत नेतृत्व आणि नियोजन कसे असावे याचा परिपाठच त्यांनी घालून दिला. त्यांचाकडे जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. आज त्यांच्या पाठिशी जिल्ह्यातील कॉंग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या विश्वासाने उभे राहिले आहेत. आ. गोरे जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी बांधिल रहाण्याचे सर्वांनी ठरवले आहे. आ. गोरेही सर्वांच्या हिताचा आणि जिल्ह्याच्या विकासाचा निर्णय लवकरच घेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आता माझी वेळ आली आहे…
आ. जयकुमार गोरे यांचे माझ्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत मोठे योगदान आहे. लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळविण्यापासून ते निवडणूक जिंकण्यापर्यंत त्यांनी सर्व कसब पणाला लावले होते. सर्वात मोठी रिस्क घेतानाही त्यांनी माण खटावचा पाणीप्रश्न आणि सर्वांगीण विकास या मुद्यांनाच प्राधान्य दिल्याचे लवकरच सर्वांना पहायला मिळणार आहे. त्यांनी मित्र म्हणून माझ्यासाठी खूप काही केले आहे. आता माझी वेळ आली आहे. विधानसभा निवडणुकीत आम्ही दोघे मिळून जिल्ह्यातील आमच्या संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्याचा स्वाभिमान जपणाराच निर्णय घेवू असेही खा. निंबाळकर यांनी सांगितले.