सूर्यकांत पाटणकर
पाणलोट क्षेत्रातील पावसाचीही विक्रमी नोंद
पाटण – महाराष्ट्र राज्याची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असलेल्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यावर्षी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या उभारणीपासूनच्या दिवसात यावर्षी (3 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट) या पाच दिवसात धरणात तब्बल 50.63 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर केवळ पाच दिवसात तब्बल 48 टक्के धरण भरण्याचा विक्रम यावर्षी कोयना धरणाने केला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसाने विक्रमाची नोंद केली आहे.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यावर्षी जोरदार पावसाने धुमाकूळ घातला. संपूर्ण जूनसह अर्धा जुलै कोरडा गेला असताना कोयना धरण यावर्षी पूर्ण क्षमतेने भरेल की नाही, अशी शंका असतानाच 26 जुलैनंतर पावसाने अक्षरशः झोडपून काढले. 30 ते 40 मिलीमिटर पावसाची नोंद होत असलेल्या कोयना, नवजा, महाबळेश्वर याठिकाणी 26 जुलैनंतर 250 ते 300 मिलीमिटर पावसाची नोंद करण्यात येवू लागली. त्यामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही झपाट्याने वाढू लागली होती. या कालावधीत 26 ते 31 जुलै दरम्यान धरणात पाच दिवसात तब्बल 21.31 टीएमसी पाणीसाठा झाला होता. या काळात धरणाचा एकूण यावर्षीचा पाणीसाठा 78.29 टीएमसीवर पोहचला होता.
कोयना धरणात येणाऱ्या पाण्याचीआवक व पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस यामुळे कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून 1 ऑगस्ट रोजी एका जनित्रातून 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला. तर 2 ऑगस्टला दुसऱ्या जनित्रातून 1050 क्युसेक पाणी वीज निर्मिती करून सोडण्यात आले. कोयना धरणात पुरेसा पाणीसाठा झाल्यानंतर धरणाच्या सहा वक्र दरवाजातून विसर्ग करण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला. या दरम्यान महाबळेश्वर, नवजा व कोयना याठिकाणी जोरदार अतिवृष्टी होत होती. महाबळेश्वरला 213 व नवजा याठिकाणी 155 मिलीमिटर पावसाची नोंद झाली.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस व धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने 3 ऑगस्टला धरणाच्या सहा वक्र दरवाजे दोन फूटांनी उचलून कोयना नदीत 11 हजार 427 व पायथा वीजगृहातून 2100 असा एकूण 13 हजार 527 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. 88.50 टीएमसी पाणीसाठा असल्याने धरण पुर्ण क्षमतेने भरण्यासाठी
केवळ 16.75 टीएमसीची आवश्यकता होती. त्यामुळे धरण भरण्याची कोणतीही समस्या नव्हती. मात्र 3 ऑगस्ट नंतर मुसळधार पडणाऱ्या पावसाने कोयना धरण व्यवस्थापनाचे अंदाज फोल ठरवत कोयना धरण क्षेत्रात जोरदार अतिवृष्टी सुरू झाली. त्यामुळे धरणात तब्बल 82 हजार 010 प्रतिसेकंद पाण्याची आवक होवू लावली. महाबळेश्वर, नवजा, कोयना या अतिपर्जन्य क्षेत्रात तब्बल 350 ते 400 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. मात्र तरीही कोयना धरणातून विसर्ग वाढविण्यात आला नाही. 4 ऑगस्टला धरणातून 20 हजार 998 क्युसेक पाणी नदीत सोडण्यात येतहोते.दुपारी पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा विसर्ग वाढवून धरणाचे दरवाजे 11 फूटांनी उचलून नदीपात्रात 65 हजार 053 क्युसेक पाणी सोडण्यात आले. गरजेनुसार विसर्ग वाढवून रात्री 10 वाजता 80 हजार क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले.
कोयना धरणाची संचय पातळी पुर्ण क्षमतेकडे जात असल्याने 5 ऑगस्ट रोजी धरणाचा विसर्ग वाढविण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला. रात्री 9 पर्यंत कोयना धरणातून नदीपत्रात 1 लाख 10 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले. मात्र यावेळी पडणारा पाऊस व धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मोठी असल्याने धरण व्यवस्थापनापुढे धरणातून विसर्ग करण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याने 5 जुलै ते 7 जुलै रोजी सातत्याने धरणातून विसर्ग वाढविण्यात येत होता.
याच कालावधीत धरण बांधणीच्या इतिहासात पहिल्यांदा 3 ते 7 ऑगस्ट यादरम्यान विक्रमी पाण्याची आवक धरणात झाली आहे. या पाच दिवसात धरणात तब्बल 50.63 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण या कालावधीत 48 टक्के भरले आहे.