23 घरांची पडझड; चौदापेक्षा जास्त गावांना फटका; 6 गावे पाच दिवसांपासून संपर्कहीन
नद्या सफाईसाठी शासनाने निधी द्यावा
पाटण तालुक्यातील साखरी धरणाखालील ओढ्यावर पूराचे पाण्याने प्रचंड प्रमाणात घाण साचली असून सर्वत्र तीच अवस्था आहे. गारवेलसारख्या जलपर्णीमुळे तसेच झुडपांनी नदीपात्र भरली असून हे ओढे, नद्या सफाईसाठी शासनाने निधी द्यावा, तुटलेल्या पुलांचे प्रस्ताव पाठवून त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
ढेबेवाडी – ढेबेवाडी विभागात मुसळधार पडणाऱ्या पावसाने 23 घरांची पडझड झाली आहे. तर रस्ता खचणे, घरात पाण्याचा उमाळा फुटणे, पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प होणे, पूल तुटणे यासारख्या घटना घडल्या आहेत. यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे याशिवाय या पावसामुळे पिकांची अवस्था बिकट असून ओला दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
गेली पाच-सहा दिवस झाले पावसाने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हाहाकार माजवला आहे. ढेबेवाडी विभागात पावसाळ्यात पाऊसमान चांगले असते. यावर्षी अति मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंडलअधिकारी प्रवीण शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अति पावसाने विभागातील महिंद, बाचोली, बनपुरी, सळवे, जिंती, मंद्रुळकोळे, मंद्रुळकोळे खुर्द, जानुगडेवाडी, शितपवाडी, आचरेवाडी, काळगाव, मस्करवाडी नं 1, ढेबेवाडी, डाकेवाडी येथील घरांच्या पडझडी झाल्या असून वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या कुटुंबांना सुरक्षित राहण्याची सोय केली असल्याचे महसूल विभागाने सांगितले आहे. याबरोबरच तामिणे येथे राहत्या घरात चुलीमध्येच पाण्याचा उमाळा लागला असून या कुटुंबास ग्रामपंचायत कार्यालयात हलविण्यात आले आहे.
कुठरे, ता. पाटण येथे माळावरील वस्तीकडे जाणारा रस्ता तसेच महिंद बोर्गेवाडी जाणारा खचला आहे. यामुळे या गावांकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. पवारवाडी (कुठरे) येथील पूल तुटुन डोंगर पठारावरील मत्रेवाडी, सलतेवाडी, नवी, कसणी, निगडे, म्हाईंगडेवाडी या गावांचा पाच दिवसापासून संपर्क तुटला असल्याने येथील लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. विभागातील मंद्रुळकोळे, धामणी, खळे, काढणे, पवारवाडी, कसणी या प्रमुख वाहतूक पुलांसह अनेक ठिकाणी ओढ्यावरील फारशी पूल पावसाचा जोर वाढताच पाण्याखाली जात असल्याने वाहतूक धोकादायक झाली असल्याने लोकांनी काळजी घ्यावी, असे महसूल विभागाचे वतीने सांगण्यात आले आहे.
गुढे गावातील बडेकर वस्ती येथील सहा कुटुंबांनी डोंगरकडा कोसळण्याची भीती वर्तवली. त्यांना महसूल विभागाने गुढे येथील प्राथमिक शाळेत तर मस्करवाडी नं 1 येथील चार कुटुंबाना डोंगरकडा जवळ असल्याने नातेवाईकांच्या घरात सुरक्षित हलविण्यात आले आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर फार मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
सुतारवाडी (सणबूर), ता. पाटण येथे मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवितहानी झालेली नाही.
घरातील सर्व जण झोपेत असल्याने अचानक झालेल्या मोठ्या आवाजाने सर्व मंडळी भयभीत झाली. प्रसंगावधान राखून घरातील मंडळी बाहेर पडली. सुदैवाने भिंत बाहेरील बाजूस कोसळल्याने मोठा अनर्थ टळला. भिंत पडल्याने मोठे नुकसान झाले असून या कुटुंबाला मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. काळगांव विभागात पावसाचा जोर कायम असून वांग नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. साखरी धरण 100 टक्के भरले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे वांग नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
जाधवाडी, वाझोली, धामणी, पुल आठ दिवसापासून पाण्याखाली गेले आहेत. तर पवारवाडी, काळगांव, पुल तुटल्याने वाहतूकीस धोका निर्माण झाला असून अनेक गावे संपर्कहीन झाले आहेत. पाण्याखाली तुटलेले पुल दिसून येत नसल्याने फलक लावण्यात यावे, अशी मागणी पंचायत समिती सदस्य पंजाबराव देसाई यांनी केली आहे.
ढेबेवाडी विभागात मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी जमिनी खचण्याचे प्रकार घडले असून मोठ-मोठी झाडे उन्मळून विजेच्या खांबावर पडल्याने तारा तुटून गांवे अंधारात गेली आहेत. तर पिकांचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे. नदीकाठच्या सर्व शेती पंपाना जलसमाधी मिळाली आहे. शासनाने याचा पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.