भारतीय चित्रपट प्रदर्शित करण्यासही मज्जाव
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या बाबतीत केंद्र सरकारने घेतलेला निर्णय पाकिस्तानला अजूनही पचवता येत नाही. त्यामुळे भारतासोबतच्या सर्वच गोष्टींवर पाकिस्तानने निर्बंध आणले आहेत. त्यातच आता भारत-पाकिस्तानमध्ये धावणारी समझोता एक्स्प्रेस रेल्वे बंद करण्याचा निर्णय पाकने घेतला आहे.
गुरुवारी पाकिस्तानातून निघालेली ही एक्स्प्रेस वाघा बॉर्डरआधी थांबवण्यात आली. त्यामुळे भारतीय अधिकाऱ्यांनी व सुरक्षारक्षकांनी ती गाडी तेथून अटारी रेल्वे स्थानकावर आणली. रेल्वे कर्मचारी व प्रवासी यांना तेथून आणण्यात आले. या गाडीत 119 प्रवासी होते. याखेरीज पाकिस्तानी चित्रपटगृहांमध्ये भारतीय चित्रपट प्रदर्शित करण्यावरही बंदी घालण्याचा निर्णय इम्रान खान सरकारने घेतला आहे. इम्रान खान यांच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या साहाय्यक डॉ. फिरदौस आशिक अवान यांनी याविषयी माहिती दिली. भारत सरकारने काश्मीरविषयक घेतलेल्या निर्णयानंतर आम्ही भारताशी व्यापारी संबंध व सांस्कृतिक संबंध बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व भारतीय सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्याचे धोरण आम्ही आखत आहोत असेही अवान यांनी म्हटले.