पुणे जिल्हा – भोर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु असून तालुक्यातील नीरादेवघर धरण परिसरात धुव्वाधार पाऊस सुरुच असल्याने आज (दि.३ आॅगस्ट) रोजी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून धरण ओव्हर फ्लो झाले आहे.
धरणाच्या पावर हाऊस मधून ७५०० तर पाच मोऱ्यातून १०,८२१ क्युसेसने पाण्याचा विसर्ग केला जात असल्याचे नीरादेवघर धरण प्रकल्पाचे शाखा अभियंता परमानंद गोसावी यांनी सांगितले.
नीरादेवघर धरण आज दुपारी तीन वाजण्याचे सुमारास ९८.२९% भरले असून सायंकाळपर्यंत धरण १००% भरेल अशी माहिती गोसावी यांनी दिली आहे. पाऊस असाच टिकून राहिल्यास धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवावा लागेल. त्यामुळे २० हजार क्युसेसने नीरा नदीत पाणी सोडले जाऊ शकते. त्यामुळे नीरा नदी काठच्या गावातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असून तसे लेखी निवेदन भोरच्या तहसिलदारांना दोन दिवसापूर्वीच देण्यात आले असल्याचे शाखा अभियंता परमानंद गोसावी यांनी धरण स्थळावर माहिती देताना सांगितले आहे.
नीरा देवघर धरण हे ११.९१ टी.एम.सी.पाणी साठवण क्षमतेचे असून हे धरण मातीचे सल्याने धरण प्रशासणाने योग्य ती दक्षता घेऊन मुसळधार पाऊस सुरुच आसल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग धरण १००% भरण्याआगोदरच सुरु केला असला तरीही आज सांयकाळपर्यंत धरण १००% भरेल असा विश्वास शाखा अभियंता गोसावी यांनी व्यक्त केला आहे.
नीरादेवघर धरण स्थळी धरणाची व्यवस्था पाहणाऱ्या कर्मचार्यांसाठी राहण्यासाठी बांधलेले आरसीसी मधील दोन मजली विश्रामगृह धरण क्षेञात अतीवृष्टी असल्याने गळत आहे. त्यामुळे व्यवस्थापन करणाऱ्या ६-७ कर्मचार्यांना अशा परिस्थितीत विश्रामगृहात रहावे लागत असून त्यांची मोठी गैरसोय होत आहे.त्यामुळे या निवास गृहाची दुरुस्ती तातडीने होणे गरजेचे आहे.
भाटघरही ९५% भरले..
भाटघर धरण क्षेत्रातही संततधार पाऊस कोसळत असून धरण आज सकाळी ९५.७०% भरले आहे. येत्या दोन दिवसांत हेही धरण १००% भरेल, असे शाखा आभियंता अनिल नलावडे यांनी सांगितले आहे. भाटघर धरण २४ टि.एम.सी. पाणी साठवण क्षमतेचे धरण असून या धरणाचे पाण्यावर पूर्वेकडील शेतकऱ्यांची शेती आवलंबुन असते. याच बरोबर वीर धरणात ९३.५६% पाणी साठा झाला असून भाटघर आणि नीरादेवघरचे पाणी या धरणात संकलित करुन ते बारामती आणि पंढरपुरला कालव्यांव्दारे पुरवले जाते. वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरण प्रकल्पात ९९.३७% पाणी साठा झाला असून हे ही धरण सायंकाळपर्यंत १००% भरेल.