पावसाचे सरासरी प्रमाण नाही; चारा टंचाईमुळे दुध उत्पादनावरही परिणाम
दिगंबर पडकर
माळेगाव- बारामती तालुक्यात पावसाने अद्यापही सरासरी गाठलेली नाही. त्यातच पाटबंधारे खात्याने कालव्याची आवर्तने बंद केली आहेत. पाऊस नसल्याने विहिरींची पाणीपातळी घटली आहे. ओढे-नाले असे पाण्याचे स्त्रोत आटल्याने शेतीकरिता पाण्याची टंचाई भासत आहे. ऐन पावसाळ्यात शेतीला दुष्काळाची झळ बसू लागल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. यातून ऊस लागवडी खालील क्षेत्र घटण्यासह चारा टंचाईमुळे दुध उत्पादनावरही परिणाम होऊ लागला आहे.
बारामती तालुक्याच्या अनेक भागात अद्यापही तुरळक पाऊस झाला आहे. माळेगाव, पणदरे, सोमेश्वरसह आदी भागात कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिना सुरु झाला तरी देखील तालुक्याच्या बहुतांशी भागात पाऊस नाही. शेतकऱ्यांनी दोन ते तीन वेळा शेतीची मशागत केली आहे. मात्र, रिमझिम पावसामुळे मशागत केलेल्या शेतात फक्त गवत उगवत आहे. तालुक्याच्या जिरायती भागात सलग सहाव्या वर्षी पावसाने पाठ फिरवली आहे. यामुळे शेतकरी पूर्णत: आर्थिक संकटात सापडला आहे. पाऊस लांबलेला असतानाच नीरा डाव्या कालव्याचे पाणाही जलसंपदा खात्याच्या आदेशानुसार पाटंबधारे खात्याने बंद केले आहे. याचा फटका तालुक्यातील बागायती गावांतील शेतवर झाला आहे. यामुळे ऊसा सारखे नगदी पीक नव्हे तर खरीप हंगामातील कमी पाण्यावरील येणारी पीकेही शेतकऱ्यांनी घेतलेली नाहीत.
बारामती तालुक्याचा माळेगाव पट्टा पूर्णत: बागायती समजला जातो. माळेगाव, पणदरे परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड होते. हा भाग नीरा डाव्या कालव्यावर अवंलबून ओह. या परिसरात अंदाजे 30 ते 35 हजार एकर ऊसाची नोंद कारखान्याच्या शेतकी खात्यावर होत असते. परंतु, या कालव्याचे आवर्तनच बंद झाल्याने या भागातील ऊसाचे क्षेत्र घटणार आहे. नीरा डावा कालव्यावर बारामती शहर परिसरासह काटेवाडी, भवानीनगरची शेतीही अवंलबून आहे. परंतु, कालव्याचे आवर्तन बंद केल्याने या परिसरातील ऊसाचे क्षेत्रातही यंदा घटणार आहे. या क्षेत्रातील जवळपास 30 ते 40 टक्के ऊसक्षेत्राची घट होण्याची शक्यता श्री छत्रपती कारखान्याच्या शेतकी खात्याकडून व्यक्त केली गेली आहे. नीरा डाव्या कालव्यावर आधारीत जवळपास 70 टक्के क्षेत्रावरील ऊस लागवड होणार नसल्याची चिन्हे आहेत.
- चारा पडतोय कमी…
बारामती तालुक्याच्या जिरायती पट्ट्यातील सुपा, मोरगाव, लोणी, उंडवडी मंडळ कार्यक्षेत्रात अद्यापही दुष्काळी स्थिती कायम आहे. यामुळे शेतीसह पशुधनही धोक्यात आले आहे. पंचायत समितीच्या नोंदीनुसार बारामती तालुक्यात 13 हजार 363 पशुपालक आहेत. 13 हजार 464 लहान तर 46 हजार 632 मोठी जनावरे आहेत. त्यातही 85 हजार 647 शेळ्या-मेंढ्यांचीही नोंद आहे. यानुसार मोठ्या जनावरांना प्रतिदिन 15 ते 18 किलो चारा, लहान जनावरांना दररोज 7 ते 10 किलो प्रतिदिन चाऱ्याची गरज असते, यानुसार प्रतीदिन जवळपास 782.513 टन चाऱ्याची गरज भासत असून तशी मागणी होत आहे. मात्र, चारा कमी पडत असल्याने त्यानुसार नियोजन करावे लागत असल्याचे सांगण्यात आले. - दुध व्यावसायाला फटका…
बागायती आणि जिरायती पट्ट्यांतील गावांत यंदा चारापीकाची पेरणीच झालेली नसल्याने हिरवा चारा पशुधनास कमी पडत आहे. याच फटका दुध व्यावसायावर होत आहे. तालुक्यात जवळपास 30 ते 35 टक्के दुध संकलन कमी होत आहे. माळेगाव, पणदरे यासह वडगाव निंबाळकर, सोमेश्वरनगर आदी परिसरातील दुध व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. इंदापुर तालुक्यातून सुका चारा आणून जनावरांना द्यावा लागत असल्याने दुधाचे प्रमाणही कमी झाले आहे. तालुक्यात सहकारी साखर कारखान्यांसह काही ठिकाणी चारा छावण्या सुरू असल्या तरी अशा छावण्यांनाही चारा टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. - बियाणे, खत पडून…
कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार शेतकयांनी पिकांची निवड केली असली तरी पावसाअभावी बाजारपेठेत खते आणि बियाणे पडून आहेत. बीजप्रक्रिया करून पेरणी करण्याचे आवाहन कृषी अधिकाऱ्यांकडून करण्यात येत असताना बियाणांना उठाव नसताना उपलब्ध बियाणे कशी सांभाळावीत, असा प्रश्न आता तालुका कृषि अधिकाऱ्यांना पडला आहे. पाऊस नसल्याने पेरणी नाही; त्यामुळे बियाणे पडून असताना खतांनाही उचल नाही. यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात तालुका पातळीवर शासकीय गोदामात बिणाणे आणि खते पडून आहेत. पेरणीसाठी पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या बियाणांचाही वापर होतो, असे बियाणे आठवडा बाजारात मिळते, परंतु, यंदा अशा पद्धतीने कोणीही बियाणे तयार केलेले नाहीत अथवा विक्री होताना दिसत नाही. यंदा प्रथमच खतांसाठी आगाऊ नोंदणी झालेली नसल्याने कृषिभाडारांचा व्यवसायही मंदीत आहे.