श्रीनगरः जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असणाऱ्या तणावपुर्ण वातावरणाचा आता राजकीय पक्षांनी चांगलाच धसका घेतला असल्याचे दिसत आहे. कारण याच परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पीडीपी, एनसी आणि जम्मू-काश्मीर पीपल्स मूव्हमेंटने आपत्कालीन बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्वच पक्षांनी आपापले प्रतिनिधी पाठवले आहेत. या बैठकीत कोणत्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे, याचा अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.
शुक्रवारी केंद्र सरकारने अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्याच्या सावटामुळे ही यात्रा स्थगित केली आहे. अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीर सरकारने यात्रेकरुंना आणि पर्यटकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. तसेच लवकरात लवकर माघारी परतण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. तसेच अमरनाथ यात्रा 4 ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. अमरनाथ यात्रेकरू आणि पर्यटकांना काश्मीर घाटीत थांबण्याचा कालावधी कमी करून लवकरात लवकर परतीचा मार्ग स्वीकारण्यास सरकारने सांगितले आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव (गृह) यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या सिक्युरिटी ऍडव्हायजरीत भाविकांना आणि पर्यटकांना यात्रेचा कालवधी कमी करण्यास आणि लवकरात लवकर परत जाण्यास सांगितले आहे.