सोसायटीतील शिष्टमंडळाकडून पालिकेला निवेदन
कराड – येथील कृष्णा नदीवरील पडलेल्या जुन्या पुलासोबत विद्यानगर, गजानन सोसायटीला पालिकेकडून पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची मुख्य वितरण नलिकाही वाहून गेली आहे. त्यामुळे पाच दिवसांपासून पाणी योजना सुरू करण्याच्यादृष्टीने कोणतीही हालचाली न झाल्याने तत्काळ योजनेच्या वितरण नलिकेचे काम सुरू होवून नागरीकांना पाणी पुरवठा व्हावा, या मागणीसाठी गजानन सोसायटी व संलग्न वसाहतीतील शिष्टमंडळाने माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, विरोधी पक्षनेते सौरभ पाटील, तहसिलदार अमरदिप वाकडे यांची भेट घेवून निवेदन दिले.
यावेळी गजानन सोसायटीचे अध्यक्ष जयंत पाटील, संचालक कांतीलाल जैन, शरद हरिदास, दत्ता भट, रामभाऊ पाटील, प्रकाश बोधे, सचिव अरूण गुजट्टी, प्रा. श्रीकृष्ण जोशी, गोवारेचे उपसरपंच विजय पाटील, सदस्य वैभव बोराटे, हजारमाचीचे सदस्य सर्जेराव पानवळ, भीमराव कणसे, रत्नदीप सोसायटीचे अध्यक्ष कृष्णत देशमुख, तात्यासाहेब महाडीक, हरिदास तुपे, सुर्यकांत गिरी, पी. डी. पाटीलनगरचे अध्यक्ष एम. एच. पाटील, आर. डी. भालदार, निलेश रेळेकर, सचिन देशमुख आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता.
निवेदनात म्हटले आहे की, 2012-13 सुजल निर्मल योजनेतंर्गत कराड पालिकेने गजानन सोसायटी व संलग्न वसाहतींसाठी पाणी योजना सुरू केली. त्याद्वारे परिसरात सुमारे साडे बाराशे नळकनेक्शन देण्यात आले आहे. सोमवार, दि. 29 जुना कृष्ण पूल पडल्याने त्या पुलावरून आणण्यात आलेली योजनेची वितरण नलिकाही वाहून गेली. त्यामुळे सोमवारपासून पाणी योजना बंद आहे. टाकी भरण्यासाठीची मुख्य वितरण नलिकाच तुटल्याने नागरीक पाच दिवसांपासून पाण्याविना वंचित आहेत.
नवीन पुलाच्या कामात वितरण नलिका टाकण्याचा समावेश असल्याने व अद्याप त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नवीन पुलावरून मुख्य वितरण नलिकेचे काम तातडीने सुरू करून नागरीकांना लवकरात लवकर पिण्याचे पाणी मिळावे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.