कोल्हापूर – राज्यात वरुणराजाने सर्वच ठिकाणी हजेरी लावली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू असून गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 349.57 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर राधानगरी धरणं 86 टक्के भरले आहे. त्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे.
सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील भोगावती, पंचगंगा, कासारी नदीच्या पाणीपातळीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. तर 33 बंधारे पाण्याखाली आहेत. पंचगंगा नदीच्या पातळीत देखील वाढली असून 33 फुटांवर आली आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील 11 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. गगनबावडा तालुक्यातील टेकेवाडी गावाची वाहतूक पूर्णतः खंडित झाली आहे. दोडामार्ग, शिरढोन एसटीची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे शाहूवाडी तालुक्यातील मालवाडी पूल खचल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान, पुढील 24 तासांत घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.