भुईंज येथील महिलांच्या
रवी कुचेकर
भुईंज – भुईंज (ता. वाई) येथील सावता वॉर्डमधील शौचालयाची दुरवस्था झाली असून, आतून कड्या तुटलेल्या, बाजूचा सर्व परिसर दलदलीचा असून मागील दोन वर्षांपासून भुईंज ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्याने परिसरातील महिला भुईंज ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त करीत आहेत.
सावता वार्डमध्ये काही वर्षांपूर्वी महिलांसाठी सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. शौचालयाच्या आतील कड्या तुटलेल्या असून बाजूला असलेल्या पाण्याच्या टाकीला आठ- आठ दिवस पाणीच नसते. शौचालयाच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी प्रचंड कचरा साठलेला असून सध्या पावसामुळे तर परिसरामध्ये दलदल झाली आहे.
या घाणीमुळे आणि दुर्गंधीमुळे परिसरातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवेळी मतदान मागायला येणारे तथाकथित पुढारी आता मात्र मूग गिळून गप्प का आहेत, हा प्रश्न येथील महिलांना पडला असून यापुढे मते मागायला येणाऱ्या या पुढाऱ्यांना त्या शौचालयापुढे उभे करून जाब विचारणार असल्याचा इशारा येथील महिलांनी दिला. या वॉर्डमधील शौचालयाचा प्रश्न दोन वर्षांपासून निर्माण झालेला असून अनेक वेळा या सगळ्या समस्या ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून देऊनसुद्धा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने तेथील रहिवाशी महिला संतप्त झाल्या आहेत.
निकृष्ट बांधकाम झाल्यामुळे या शौचालयाच्या संरक्षण भिंतीला मोठ्या भेगा पडून भिंत एका बाजूला झुकली आहे. त्यावेळी कित्येकदा महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयात लेखी तक्रारी दिल्या. तोंडी तक्रारी दिल्या, परंतु आश्वासनाव्यतिरिक्त महिलांच्या वाट्याला फक्त निकृष्ट दर्जाची शौचालयेच आली.
शेवटी शौचालयाची संरक्षण भिंत पडली परंतु अद्याप ती भिंत तर बांधलीच नाही उलट सात लाख रूपये किमतीचे शौचालय मंजूर होऊन आले. त्यामुळे शौचालयाच तुम्ही टेंशन घेऊ नका, असे आमिष 2017 च्या ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान दाखविण्यात आले. 2019 हे निम्मे वर्ष सपंत आले तरी सात लाखांचे शौचालय कुठे गेले ते समजलेच नाही. दरवाज्याच्या कड्या तुटलेल्या असल्याने अक्षरशः दरवाजाला बादली टेकवून धरावी लागत आहे. मोठ्या अपेक्षेने नवनियुक्त सदस्य निवडून दिले. परन्तु, वार्डातील साधा शौचालयाचा प्रश्न सुद्धा या सदस्यांना सोडवता येत नसेल तर हे सदस्य नक्की कशासाठी निवडून गेल्यात असा संतप्त सवाल महिला करीत आहेत.
महिला सरपंच म्हणून सरपंचपदाची जागा आरक्षित घोषित झाल्यानंतर महिलांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु दोन वर्ष उलटून गेली तरी अद्यापही महिलांच्या सार्वजनिक शौचालयाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने सावता वार्ड मधील महिलांमध्ये नाराजीचा सूर आहे. हे प्रश्न सोडविले नाहीत तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महिलांनी दिला आहे. महिलांचे प्रश्न पंचायतीत मांडण्यासाठी गेल्यानंतर महिला सरपंचांनादेखील गोरगरीब महिलांच्या व्यथा समजत नसतील तर महिला सरपंच आरक्षणाचा फायदाच काय, असा प्रश्न येथील संतप्त महिला विचारत आहेत.
शौचालयांच्या दुरवस्थेमुळे महिलांची गैरसोय होत आहे. त्यामुळे तातडीने शौचालयाच्या दुरुस्तीचे काम सुरू करणार आहे. शौचालयांची तुटलेले दरवाजे बसवून याठिकाणी संरक्षक भींतदेखील बांधून महिलांची होत असलेली गैरसोय टाळणार आहे.
प्रशांत जाधवराव उपसरपंच, भुईंज.