मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आजपासून सुरूवात होणार आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यात ही यात्रा पोहोचणार असून, आज जळगाव येथून पहिल्या टप्प्यातील यात्रेला सुरुवात होणार आहे. जवळपास चार हजार किलोमिटरचा प्रवास या यात्रेदरम्यान करण्यात येणार आहे. तसेच यात्रेच्या माध्यमातून जनतेशी जवळीक साधण्याचा आदित्य ठाकरे प्रयत्न करणार आहेत.
ज्या मतदारांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मत दिले त्यांचे आभार आणि ज्यांनी दिले नाही त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न या यात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. 18 जुलैला जळगाव येथून यात्रेला सुरुवात होईल. त्यानंतर 18 तारखेला धुळे आणि मालेगाव, 20 रोजी नाशिक शहर, 21 तारखेला नाशिक ग्रामीण आणि नगर जिल्ह्यातील काही भाग, तर 22 तारखेला श्रीरामपूर आणि शिर्डीत या जनआशीर्वाद यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे. जनआशीर्वादच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघापर्यंत पोहोचण्याचा मानस असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे.