शिक्रापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील प्रकार : ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
शेरखान शेख
शिक्रापूर – एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी करून आल्यानंतर तेथून परत आणलेल्या वस्तू कोणतेही लोक सहसा घरात घेत नाहीत. वापरत देखील नाहीत. लहान मुलांना त्या वस्तूंना हात देखील लावू देत नाहीत. परंतु शिक्रापूर येथे अंत्ययात्रेसाठी वापरण्यात येणारा अंत्ययात्रेचा रथ चक्क शिक्रापूर (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेत लावून ठेवण्याचा पराक्रम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू आहे.
येथील ग्रामपंचायतीला एका कंपनीच्या माध्यमातून नागरिकांना एखाद्या व्यक्तीची अंत्ययात्रा घेऊन जाणे सोपे व्हावे, यासाठी अंत्ययात्रेसाठी रथ भेट देण्यात आलेला आहे. सध्या, गावातील काही अंत्ययात्रा या रथातून नेल्या जात आहेत; परंतु अंत्ययात्रा पूर्ण झाल्यानंतर हा रथ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात आणून लावला जात आहे.
रथावर अंत्ययात्रेच्या वेळीस टाकलेली फुले घेऊन शाळेतील लहान लहान मुले खेळत असतात. अनेक दिवसांपासून हा रथ शाळेमध्ये आणून उभा करण्याचे प्रकार सुरू आहे. हा प्रकार निंदनीय असल्याचे बोलले जात आहे. परंतु ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या आणि उद्याची सक्षम पिढी घडणाऱ्या ठिकाणी हा अंत्ययात्रा रथ लावला जाऊ नये, रथ दुसरीकडे हलवून त्या रथाची पार्किंग करण्यासाठी ग्रामपंचायतीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पालक करीत आहेत.
ग्रामपंचायतीच्या वतीने अंत्ययात्रा रथ लावण्यासाठी पार्किंग शेडचे काम सध्या सुरु आहे. पार्किंग शेडचे काम पूर्ण होताच शाळेच्या आवारात लावण्यात आलेला अंत्ययात्रा रथ हटविला जाईल.
– गुलाब नवले, ग्रामविकास अधिकारीहा अंत्ययात्रेचा रथ गाडी शाळेच्या आवारात लावू नयेत, असे मी ग्रामपंचायत प्रशासनाला कळविलेले आहे. त्यानुसार ग्रामपंचायत प्रशासन अंत्ययात्रा रथ दुसरीकडे लावण्याची व्यवस्था करणार आहे.
– शैला कांबळे, मुख्याध्यापिका , जिल्हा परिषद शाळा, शिक्रापूर