पिंपरी – संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. वारीसाठी राज्यभरातून वारकरी मोठ्या संख्येंने देहू व आळंदीत येतात. वारकऱ्यांना आळंदी, देहू येथे प्रवास करण्यासाठी गैरसोय होवू नये याकरीता जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
आळंदीसाठी 22 जून ते 26 जून दरम्यान स्वारगेट, मनपा, हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड आणि पिंपरी या ठिकाणाहून दररोज 112 बसेस सोडण्यात येणार आहेत. तर, देहू साठी मनपा, निगडी, पुणे स्टेशन येथून 29 बसेस सोडण्यात येणार आहेत. तर, आळंदी ते देहू दरम्यान 9 बसेस सोडण्यात येणार आहे. 26 जून रोजी आळंदी येथून पालखी प्रस्थान होणार असल्याने स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, मनपा येथून 28 गाडयाचे नियोजन करण्यात आले आहे. तर, दैनंदिन सुरु असणाऱ्या 95 बसेस सकाळी 5:30 पासून विश्रांतवाडी, आळंदी, भोसरी पर्यंत धावणार आहेत.
या व्यतिरिक्त पुण्याहून पालख्या प्रस्थानाच्या वेळेस 28 जून रोजी दुपारी 12 ते दीड दरम्यान दर्शनासाठी पालख्या थांबणार आहेत. यासाठी महात्मा गांधी स्थानक येथून पुणे स्टेशन, वारजे माळवाडी, आळंदी, कोथरुड डेपो, निगडी, चिंचवड साठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. तर, प्रवाशांच्या प्रतिसादानुसार त्या-त्या वेळी बसेस वाढवण्यात येतील. मात्र, यासाठी प्रवाशांची किमान मर्यादा 40 असण्याची अट ठेवण्यात आली आहे. तसेच, कात्रज कोंढव्याकडे जाण्यासाठी शिवरकर गार्डन येथून मुंढवा, चंदननगर, वाघोलीसाठी मगरपट्टा येथून बससेवा व्यवस्था करण्यात आली आहे. या बससेवेचा वारकऱ्यांनी व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.