पाणीकपातीची झळ : ऊस उत्पादनावर परिणाम
– गोकुळ टांकसाळे
भवानीनगर – राज्य शासनाने नीरा डावा कालव्याचे पाणी सातारा जिल्ह्याला वळविण्याबाबत अध्यादेश काढल्यानंतर बारामती, इंदापूर तालुक्यातील सहा साखर कारखान्यांना याचा फटका बसणार आहे. पाणीकपातीमुळे कारखान्यांच्या गळीत हंगामावर परिणाम होणार असल्यामुळे भविष्यात कारखान्यांचा पांढरा हत्ती बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
नीरा डावा कालव्यातून इंदापूर आणि बारामतीला जाणारे नियमबाह्य पाणीकपात करण्यासाठी अध्यादेश काढला आहे.
त्यामुळे साखर सम्राटांचे धाबे दणाणले आहे. नीरा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रात पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्याचा समावेश आहे. यात इंदापूर तालुक्यात प्रकल्पीय सिंचन क्षेत्र 22 हजार 870 हेक्टर आहे. बारामती तालुक्यात प्रकल्पीय सिंचन क्षेत्र 13 हजार 870 हेक्टर आहे. पुरंदर तालुक्यात तालुक्यात प्रकल्पीय सिंचन क्षेत्र 420 हेक्टर आहे. तीन तालुक्यांतील सहकारातील सहा साखर कारखाने कार्यरत आहेत. यात इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती, नीरा- भीमा, कर्मयोगी कारखान्यांचा समावेश आहे.
चाळीस वर्षांत इंदापूर आणि बारामती तालुक्यात सहकारातून शेती फुलली आहे. इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती, नीरा- भीमा, कर्मयोगी कारखान्यांमुळे इंदापूरच्या अर्थकारणाला गती मिळाली आहे. नीरेचे पाण्याचा कारखान्यांत दोन तळ्यात साठा केला जात आहे. हा पाणीसाठा दोन तळ्यांतून एक महिन्यांचा पाणीसाठा करण्यात येत आहे. बारामती तालुक्यात सोमेश्वर, माळेगाव, बारामती ऍग्रो कार्यक्षेत्रात नीरा कालव्याला लाभ होत आहे. तीन कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात सुमारे बारा हजार एकर ऊस शेती लागवडीखाली आणली आहे. सोमेश्वरचे सभासद हे पुरंदर तालुक्यातही आहेत. या तालुक्यात 420 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे. अध्यादेश काढल्यामुळे सहकारसम्राटांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. याचे दूरगामी परिणाम सहकारावर होणार आहेत.
नीरेच्या पाणीप्रश्नावर तत्कालीन राज्यकर्ते अकार्यक्षम ठरले आहेत. आदी कल्पना होती तर नवीन धरणे का निर्माण केली नाहीत. हा सवाल राज्यकर्त्यांना जनतेने विचारणे गरजेचे आहे. पाणी जाणार हे माहित होते, मग तयारी का केली नाही. राज्यकर्त्यांना पुढचे 50 वर्षांचे कळले पाहिजे होते. यात शासनाचा कोणताच दोष नाही. परंतु हा प्रश्न समन्वयाने सोडविला पाहिजे.
– पृथ्वीराज जाचक, माजी अध्यक्ष, साखर संघ.