हिंजवडी, (वार्ताहर) – राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताह 4 मार्च ते 11 मार्चपर्यंत साजरा करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर कासारसाईतील श्री संत तुकाराम साखर कारखान्यामध्ये राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला.
या वेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. जी. पठारे यांनी कामगारांना मार्गदर्शन करताना सांगितले की, सर्व कर्मचार्यांनी काम करताना योग्य त्या सुरक्षा साधनांचा काटेकोरपणे वापर करावा.
सर्वांनी प्रथम आपल्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे. औद्योगिक क्षेत्रात काम करीत असताना विना अपघात जबाबदारीने काम केले पाहिजे. आपल्यावर परिवाराची पालन पोषणाची जबाबदारी असल्याने प्रत्येकाने स्वतः सुरक्षिततेला महत्व द्यावे.
या प्रसंगी कामगार युनियनचे माजी अध्यक्ष सत्यवान शिखरे यांनीही सर्व कामगारांना सुरक्षिततेच्या नियमांची काटेकोरपणे अमंलबजावणी करून विना अपघात काम करावे असे सांगितले. सुरक्षा सप्ताहातच नव्हे तर वर्षभर विना अपघात काम होईल असे प्रयत्न करण्याचे सांगितले.
कारखान्याचे प्रभारी सचिव मोहन काळोखे यांनी सर्व कामगारांना सुरक्षिततेची शपथ दिली. या प्रसंगी कारखान्याचे चिफ इंजिनिअर आर. बी. जगदाळे, प्र.चिफ अकाउंटंट एस. एस. दाभाडे, डिस्टीलरी इन्चार्ज एस. पी. पवार, बँक स्थायी तपासणी अधिकारी व्ही. बी. धुमाळ, हेड टाईम किपर एस. आर. पवार, प्र. ऊस पुरवठा अधिकारी एच. के. गोपाळे, सुरक्षा अधिकारी एस. ए. मुळे, कारखाना कामगार पतसंस्था, कामगार युनियनचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.