लोणी काळभोर, (वार्ताहर)- थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे मतदान शनिवार (दि. ९) रोजी होणार आहे. या निवडणुकीत कारखान्याचे एकवीस हजार सभासद कोणत्या पॅनलला झुकते माप देणार ते मतपेटीत बंद होणार आहे. गुरूवारी (दि.७) संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून स्लीप वाटप, मतदारांच्या गाठीभेटी यावर दोन्ही पॅनेलने जोर दिला आहे.
यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी दोन्ही पॅनलचे ४२ उमेदवार वगळता अजून १२ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल व अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी या दोन पॅनलमध्ये अटीतटीची लढत होत असून ही निवडणूक चुरशीची होणार आहे.
यशवंत कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर, बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, संचालक रोहिदास उंद्रे यांच्या नेतृत्वाखालील अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनल, तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, प्रकाश जगताप, विद्यमान संचालक प्रशांत काळभोर, बाळासाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखालील अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी या दोन पॅनलमध्ये लढत होणार आहे.
आर्थिक अनियमितेमुळे मागील तेरा वर्षांपासून बंद असलेल्या कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगणात पॅनल प्रमुख म्हणून ज्येष्ठ नेते माधव काळभोर, बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, महादेव कांचन, प्रताप गायकवाड, प्रकाश जगताप, प्रशांत काळभोर हे सहकारातील प्रमुख नेते तर कारखान्याचे उमेदवार म्हणून माजी उपाध्यक्ष व हवेली बाजार समितीचे संचालक रोहिदास उंद्रे, माजी संचालक राजीव घुले, माजी संचालक आप्पासाहेब काळभोर,
माजी अध्यक्ष अशोक काळभोर यांचे चिरंजीव सागर काळभोर, माजी संचालक महादेव कांचन यांचे चिरंजीव अजिंक्य कांचन, माजी संचालक सुभाष जगताप, संतोष आबासाहेब कांचन, लोणी काळभोरचे सरपंच योगेश काळभोर, फुरसुंगीचे अमोल हरपळे, दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती सुशांत दरेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन म्हेत्रे आदी दिग्गज रिंगणात उतरल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे.
दोन्हीं पॅनलमधील उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने पूर्व हवेलीसह संपूर्ण जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिले आहे. यशवंत कारखाना आर्थिक अनियमितेमुळे २०११ साली बंद पडला. त्यानंतर कारखाना सुरू करण्यासाठी बरेच प्रयत्न झाले. परंतु, कारखाना सुरू झाला नाही. बंद कारखान्याची निवडणूक होत असल्याने उमेदवारी अर्ज कमी येतील, अशी अपेक्षा असताना ३२० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.
नवीन पिढीची नोंदच नाही
एकूण २१०१८ सभासदांपैकी १६८२८ (८० टक्के) पुरुष मतदार असून ४२९० (२० टक्के) महिला मतदार आहेत. त्यापैकी ७४३९ मतदार मयत आहेत. गेली १३ वर्षे कारखान्याचे कार्यालय बंद असल्याने नवीन पिढीची वारस नोंद होऊ शकली नाही. त्यामुळे १८ ते २४ या वयोगटांतील एकही तरुण कारखान्याचा सभासद नाही,
पर्यायाने मतदानाचा अधिकार त्यांना नाही. २५ ते ३९ या वयोगटातील फक्त २५३ (फक्त १ टक्के) मतदार आहेत. ४० ते ५९ या वयोगटातील ५८०१ (२८ टक्के) मतदार आहेत. तर ६० वर्षावरील १३६८३ (६५ टक्के) मतदार आहेत. म्हणजे ६० वर्षावरील मतदारांचा कल ज्या पॅनलकडे झुकणार आहे, तो पॅनेल सहजपणे निवडून येणार आहे.
चाळीशीपार मतदार निर्णायक ठरणार
साधारण ४० वर्षाच्या पुढील जितके जास्त मतदार जो पॅनल आपल्याकडे वळवण्यात यशस्वी होईल, त्यांच्या गळ्यात विजयश्री माळ घालणार आहे, हे सत्य आहे. १३ हजार ५७९ मतदार या निवडणुकीत मतदान करु शकतील. यापैकी किती मतदार आपले मतदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडतील. त्यावरच कुठला पॅनल निवडून येणार हे ठरणार आहे.